रणजितदादांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सदिच्छा भेट; सातारा व सोलापूरच्या विकासावर सखोल चर्चा

स्थैर्य, नवी दिल्ली, दि. ४ ऑगस्ट : माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आज नवी दिल्ली येथे देशाचे केंद्रीय गृहमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांची सदिच्छा भेट घेतली. या अत्यंत महत्त्वपूर्ण भेटीमध्ये सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्न, राजकीय घडामोडी आणि विकासकामांच्या अनुषंगाने सखोल चर्चा करण्यात आली.

विकासाच्या मुद्द्यांवर सविस्तर मंथन

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या या विशेष बैठकीत, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सातारा आणि सोलापूर या दोन्ही जिल्ह्यांतील सद्यस्थितीची माहिती दिली. या भागातील शेती, सिंचन, सहकार क्षेत्रातील अडचणी आणि पायाभूत सुविधांच्या विकासासंदर्भात यावेळी प्रामुख्याने सकारात्मक चर्चा झाली. या दोन्ही जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रलंबित प्रकल्पांसाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून भक्कम सहकार्य मिळावे, अशी भूमिका रणजितदादांनी यावेळी मांडली.

रणजितदादांच्या राष्ट्रीय पातळीवरील वजनाची पुन्हा चर्चा

गेल्याच महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रणजितदादांच्या विंचुर्णी येथील फार्म हाऊसवर वेळ दिला होता, तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही त्यांच्या पाठपुराव्यातून कोट्यवधींचे रस्ते मंजूर केले आहेत. त्यानंतर आता थेट देशाच्या केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत दिल्लीत झालेली ही सविस्तर चर्चा पाहता, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे दिल्लीच्या राजकीय वर्तुळातील आणि राष्ट्रीय पातळीवरील असलेले भक्कम राजकीय वजन पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

या महत्त्वपूर्ण भेटीमुळे येणाऱ्या काळात सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांतील विकासाला मोठी गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Back to top button
Don`t copy text!