![](https://i0.wp.com/sthairya.com/wp-content/uploads/2020/11/3st_20seva.jpg?resize=780%2C470&ssl=1)
स्थैर्य,सातारा, दि १० : कोरोना काळात लॉकडाउनमुळे पाच महिने एस.टी सेवा बंद ठेवल्याने महामंडळाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. आता एस.टी वाहतूक सुरु होऊनही कोरोनाच्या धास्तीमुळे प्रवाशांनी एस.टी’कडे पाठ फिरविली आहे. यासाठी कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविणे आणि प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी शहरातील “इनक्रेडिबल ग्रुप’ने सातारा-स्वारगेट विनावाहक बसला राणी लक्ष्मीबाईंचे नाव देऊन संपूर्ण बसच्या बाहेर गड-किल्ल्यांची चित्रे रेखाटली आहेत.
कोरोना काळात मार्च महिन्याच्या अखेरपासून एस.टी सेवा ठप्प झाली होती. त्यानंतर साधारण सप्टेंबर महिन्यात नियमांचे बंधन घालून काही प्रमाणात एस.टी सेवा सुरु करण्यात आली. मात्र, कोरोना संसर्गाच्या भीतीने प्रवासी संख्या अल्प असल्याचे दिसून आले. त्यामुळे एस.टी’च्या फेऱ्यांचे संचलनही कमी ठेवण्यात आले होते. दरम्यान, सद्यस्थितीत कोरोनाची रुग्ण संख्या कमी झाली असून संसर्ग नियंत्रित येत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मागील काही दिवसांत एस.टी’ने प्रवास करणाऱ्यांची संख्या काही प्रमाणात वाढली आहे. मात्र, एस.टी’ला लॉकडाउन पूर्वीचा प्रतिसाद अद्यापही मिळत नाही. त्यामुळे शहरातील इनक्रेडिबल ग्रुपने प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी अनोखा फंडा वापरला आहे.
अजिंक्यतारा, शनिवारवाडा अन् सुरक्षित प्रवासाचा संदेश
प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी बसच्या बाहेरील बाजूस अजिंक्यतारा किल्ला आणि पुण्यातील शनिवारवाड्याच्या चित्रासह इतर गड-किल्ल्यांची नावे देऊन प्रवाशी संवाद साधतानाचे चित्र रेखाटून एसटीचा प्रवास सुरक्षित असल्याचा संदेश दिला आहे, तसेच सातारा-पुणे मार्गावरील काही ठिकाणांची नावे देऊन इनक्रेडिबल ग्रुपने अनोखा फंडा वापरला आहे.