नामकरण विधीला बेकायदा जमाव जमल्याने आयोजकावर गुन्हा 


स्थैर्य, सातारा, दि. २१: कोरोना पुन्हा डोके वर काढू लागल्याने जिल्हा प्रशासनाने  पुन्हा निर्बंध कडक केले आहेत. असे असताना जिल्हाधिकार्‍यांचे आदेश डावलून विनापरवाना नामकरण विधी सोहळा आयोजित करण्याचा प्रकार घडला आहे. या विधीला उपस्थित महिलाही विना मास्क होत्या. शाहूपुरी पोलिसांच्या निदर्शनास हा प्रकार येताच त्यांनी आयोजकावर गुन्हा दाखल केला. तसेच याप्रकरणी विनामास्क 16 जणांकडून 8 हजार तर दोन दुकानदारांकडून 9 हजार दंड असा दंड वसूल केला आहे.

याबाबत माहिती अशी, शाहुपूरी पोलीस ठाणे अंर्तगत हद्दीत शिवजयंतीनिमित्त पेट्रोलिंग करत असताना रात्री साडेआठच्या सुमारास बुधवार नाका नालंदा समाजमंदीर येथे आकाश भरत खरात (वय 25) रा. बुधवारपेठ सातारा यांनी सुमारे 40-45 महिलांचा जमाव जमवून नामकरण विधी सोहळा साजरा केल्याचे निदर्शनास आले. विधीस हजर असलेल्या महिला व लहान बालके, पुरुष असे विनामास्क असल्याचे मिळुन आले. याबाबत तहसीलदार अगर शाहुपूरी पोलिसांची परवानगी घेतली का? असे विचारले असता खरात यांनी कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे दिसून आले. याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियमानुसार नामकरण विधी आयोजित करणार्‍या आकाश खरात याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच विनामास्क 16 जणांकडून 8 हजार तर दोन दुकानदारांकडून 9 हजार दंड असा दंड वसूल केला आहे.


Back to top button
Don`t copy text!