
दैनिक स्थैर्य । दि. २२ जून २०२२ । मुंबई । शिवसेनेच मंत्री आणि गटनेते असलेल्या एकनाथ शिंदे यांनीच बंडखोरी केल्यामुळे राज्यातील राजकारणासह देशातील राजकारणातही चर्चेला उधाण आले. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर शिवसेनेच्या 33 आणि बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचे 2 आमदार असल्यामुळे आता 35 आमदार आपल्यासोबत असल्याचे शिंदेंनी खुलासा केला. दरम्यान, काँग्रेसचे आमदारही सोबत येणार असल्याचा खुलासा बच्चू कडू यांनी केला आहे.
बच्चू कडू सध्या एकनाथ शिंदेंसोबत गुवाहाटी येथे आहेत. यावेळा त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सध्या आमच्यासोबत शिवसेनेचे ३३ आमदार आहेत आणि काही अपक्ष आहेत. आज आणखी काही आमदार दाखल होणार आहे. त्यामुळे शिवसेनेचा आकडा ३८ -३९ पर्यंत जाईल. एकूण आमदारांची संख्या ५० पर्यंत नक्कीच जाईल. काँग्रेसचेही काही आमदार सोबत येणार. दोन तीन दिवसांत चित्र स्पष्ट होईल. असा दावा बच्चू कडू यांनी यावेळी केला.
शिंदेसोबत असलेले सर्व आमदार खुश आहेत. आम्ही शिवसेनेला समर्पित होतो. शिवसेनेचे ७५ टक्के आमदार इथं आल्याने आम्हीही इथं आलो. कोणतीही व्यक्तिगत नाराजी नाही. निधीतली विषमता आहे, शिवसेनेने त्याकडे लक्ष दिलेलं नाही. असे कारण बच्चू कडू यांनी सांगितलं.
मी मुख्यमंत्र्यांना फोन केला होता. त्यांना सांगितलं की दोन्ही निवडणुकांमध्ये आम्ही सेनेलाच मत दिलंय, मग हे अचानक वातावरण तयार झालं आणि परिस्थिती बदलली. असा खुलासा बच्चू कडूंनी माध्यमांशी बोलताना केला.