
दैनिक स्थैर्य । दि. १६ डिसेंबर २०२१ । सातारा । सातारा मधील ज्येष्ठ नागरिकांसाठी व दिव्यांगांसाठी कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने यांच्या मोफत वाटपासाठी आयोजीत शिबीराचा ज्येष्ठांच्या आरोग्यदायी जीवनासाठी व दिव्यांगांना आत्मनिर्भर बनण्यासाठी लाभ होईल, असे प्रतिपादन सहकार, पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.
येथील अण्णासाहेब कल्याणी विद्यालयात सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, नवी दिल्ली, जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने यांच्या मोफत वाटपासाठी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराचे उद्घाटन पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या उद्घाटन प्रसंगी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, सातारच्या नगराध्यक्षा माधवी कदम, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार आशा होळकर, शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे उपाध्यक्ष अनिल देसाई आदी उपस्थित होते.
श्री. पाटील म्हणाले, जगामध्ये शारीरिक दिव्यांगात्वावर संशोधन करुन अनेक साधने निर्माण केली आहेत. आजच्या शिबीरामध्ये ज्येष्ठ तसेच दिव्यांगांना कोणत्या साधनांची गरज आहे याची तपासणी करुन दोन ते तीन महिन्यानंतर साधनांचे वाटप करण्यात येणार आहे. साधने मिळाल्यानंतर त्याचा योग्य वापर करावा. जिल्ह्यातील ज्या तालुक्यामध्ये निवडणूका नाहीत अशा ठिकाणी शिबीर घेण्यात येणार आहेत. ज्या तालुक्यातील निवडणूक कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. सध्या कोरोना संसर्ग कमी होत असला तरी ओमायक्रॉनचा नवीन व्हेंरीयट आला आहे. नागरिकांनी सामाजिक अंतर, वेळोवेळी हाताची स्वच्छता, मास्कचा वापर केला पाहिजे, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.
खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले, ज्येष्ठ नागरिक व दिव्यागांची सेवा करण्याचे भाग्य याशिबीरामुळे आम्हाला मिळाले.
दिव्यांगांच्या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासना मार्फत दिव्यांग मित्र या नावाने कक्ष स्थापन करुन त्यांच्या अडचणी सोडव्यावात.
शिबीराच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना व दिव्यांगांना त्यांना गरजेप्रमाणे साधनांचे मोफत वाटप करण्यात येणार असून हे पहिले शिबीर सातारा येथे होत असल्याबद्दल आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी प्रशासनाचे आभार मानले.
जिल्ह्यात शिबीर घेण्याबाबत गेल्या तीन ते चार महिन्यांपासून तयारी करण्यात येत आहे. याशिबीरात नोंदणी झालेल्या ज्येष्ठ व दिव्यांगांची तपासणी करण्यात येत आहे. जे राहिले आहेत त्यांना सुद्धा पुन्हा लाभ देण्यात येणार आहे. या शिबीरामध्ये विविध विभागांचे स्टॉल लावून दिव्यांगांना असणाऱ्या विविध शासकीय योजनांचे अर्जही या शिबीरात भरण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले.
जिल्ह्यात होणाऱ्या शिबीरांचा जास्तीत जास्त ज्येष्ठ तसेच दिव्यांगांनी लाभ घ्यावा, असे प्रास्ताविकात मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी सांगितले.
या कार्यक्रमास विविध विभागांचे अधिकारी ,ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग उपस्थित होते.