अस्तित्वाला धोका नाही पण, धक्का?

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘Political ठसका’ हे खास सदर आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. निश्चितच आपल्याला हे आवडेल, यात शंका नाही….

– प्रसन्न दिलीप रुद्रभटे, फलटण.

समजा भल्या मोठ्या लाखोंचे सैन्य असलेल्या साम्राज्यातील राजधानीवर काही हजारात सैन्य असलेल्या शत्रूने चाल केली तर निश्चितच त्या बलदंड साम्राज्याच्या अस्तित्वाला धोका कधीच असणार नाही. पण, चालून आलेला हजारोंचे सैन्य असलेला शत्रू धक्का मात्र पोहोचवू शकतो. आज राजेगटाच्या बलदंड साम्राज्यासमोर खासदार गट तसा कमी आहे. खासदार गटाकडे तेवढे कार्यकर्त्यांचे संख्याबळ नाही, हे स्वतः माजी खासदारही मान्य करतील. पण, खासदारकीच्या निवडणुकीत तालुक्यातील काही प्रमुख नावे आणि निवडणुकीपूर्वी विडणीसारखी प्रमुख गावे सोबत घेण्यात माजी खासदारांना यश आले आहे. एव्हाना नगरपालिकेच्या राजकारणातही माजी खासदारांनी मोठ्या प्रमाणावर घुसखोरी केलेली दिसत आहे.

खरतर नगरपालिका म्हणजे श्रीमंत रामराजे यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहे. शहराच्या हद्दीत पूर्वी खासदार गट फक्त मलठणपुरता मर्यादित होता. शहरात इतरत्र त्यांना कोण उमेदवार उभे करायचे हा प्रश्न होता. आता तसे नाही. सोमवार पेठेपासून ते जुन्या गावठाणापर्यंत सर्वत्र माजी खासदारांची फळी तयार झाली आहे. यामुळे राजेगटाच्या अस्तित्वाला धोका नाही पण, एक प्रकारे धक्का बसला आहे का? याचा अंदाज विधानसभा निवडणुकीतच येईल.

होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीला लोकसभेच्या निवडणुकीची पार्श्वभूमी आहे, हे आपण जाणतोच. यंदा पूर्वीच्या तुलनेने खासदार गटाची ताकद तालुक्यात वाढली असल्याचे सर्वांनाच मान्यच करावे लागेल. शहरातील आणि तालुक्यातील अनेक मोठी मोठी नाव आता खासदार गटाला जोडली गेली आहेत. यात ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, विश्वासराव भोसले, दिलीपसिंह भोसले यांचे चिरंजीव रणजितसिंह भोसले, विलासराव नलवडे यांच्यासह अनेकांचा उल्लेख करता येईल. लोकसभेला कहर म्हणजे श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर यांनी देखील महायुती म्हणत थेट खासदारांचे व्यासपीठ गाठल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

यातील काही नेत्यांच्या गावात किंवा शहरातील त्यांच्या प्रभागात मतदान कमी झाले असले तरी या नावांचा प्रभाव मात्र तालुक्यातील इतर मतदारांवर झाला. दोलाईमान असलेला मतदार, व्यापारी या कारणाने थोडासा का होईना खासदार गटाकडे झुकला गेला, असे म्हणता येईल.

(क्रमशः)

संजीवराजेंच्या ‘मायक्रो मॅनेजमेंट’ची कमाल तालुका अनुभवणार


Back to top button
Don`t copy text!