तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये भरारी पथकाकडून दुकानांवर कारवाई; वीस हजार दंडाची वसुली; गट विकास अधिकारी डॉ. सौ. अमिता गावडे – पवार यांची माहिती
स्थैर्य, फलटण, दि. १६: फलटण तालुक्यमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या गावांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. ग्रामीण भागातील दुकानदार व नागरिक हे सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पारित केलेले नियमांचे काटेकोर पालन करत नसल्याचे दिसून येत आहे. म्हणूनच पंचायत समितीच्या माध्यमातून पंचायत समिती गणनिहाय भरारी पथके तयार करण्यात आलेली होती. प्रत्येक भरारी पथकामध्ये पंचायत समिती शाखा अभियंता / कृषी अधिकारी किंवा विस्तार अधिकारी हे पथक प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. तर त्यांच्या सोबत सहाय्यक म्हणून प्राथमिक किंवा माध्यमिक विभागाचे दोन शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सदरील भरारी पथके हि नेमून दिलेल्या पंचायत समिती गणामध्ये कार्यरत आहेत. संबंधित पंचायत समिती गणामधील प्रत्येक दिवशी दोन गावांना भेटी देणे सदरील भरारी पथकांना अनिवार्य आहे. या भरारी पथकाने विविध ठिकाणी कारवाई करून वीस हजार दंडाची रक्कम वसूल केलेली आहे, अशी माहिती फलटण पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी डॉ. सौ. अमिता गावडे – पवार यांनी दिली.
फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. कोरोनाला आपल्या गावामधून हद्दपार करण्यासाठी गाव पातळीवर काटेकोर नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. सातारा जिल्ह्याच्या ग्रामीण भागामधून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आदेश पारित केलेले आहेत. त्याची काटेकोर अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. कोरोनाचे रुग्ण वाढू नयेत म्हणून आपण सर्वांनीच काळजी घेणे गरजेचे आहेत. भरारी पथकाला जर मास्क न घालता कोण आढळ्यास त्यास रुपये ५०० दंड आकारण्यात येत आहे. होम आयसोलेशनच्या नियमांचे पालन करताना आढळून आले नाही तर त्यास रुपये १०० दंड आकारण्यात येत आहे. या सोबतच सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तींना सुद्धा रुपये १००० हजार दंड आकारण्यात येत आहे, असेही गटविकास अधिकारी डॉ. सौ. अमिता गावडे – पवार यांनी या वेळी स्पष्ट केले.