
स्थैर्य, वाई, दि.९ : वहागाव येथील राखीव वनक्षेत्रात दि. 02 मार्च 2019 रोजी वणवा लागला होता. याप्रकरणी विंडवर्ल्ड इंडिया पवनचक्की कंपनीच्या चुकीने हा वणवा लागल्याने वाई येथील न्यायालयात सिद्ध झाल्यानंतर 5 हजारांचा दंड सुनावण्यात आला आहे.
वहगाव येथील वनविभागच्या राखीव क्षेत्रात दि. 02 मार्च 2019 रोजी वणवा लागला होता. स्थानिक तपासात हा वणवा विंडवर्ल्ड इंडिया (इनरकॉन) कंपनीचे विद्युत वाहिनीतील शॉर्टसर्किट झाल्याने लागल्याचे सिध्द झाले. विंडवर्ल्ड इंडिया कंपनीमार्फत योग्य त्या उपाययोजना न राबविल्यामुळे 11 हेक्टर वनक्षेत्र जळीत झाल्याचे सिध्द झाले. यामुळे कंपनीवर वनविभागामार्फत भारतीय वनअधिनियमाचे उल्लंघन झाल्याने वनगुन्हा नोंद करण्यात आला. त्याचा तपास पूर्ण करुन दि. 08 ऑक्टोबर 2020 रोजी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, वाई यांच्या न्यायालयात खटला दाखल करण्यात आला.
याप्रकरणी न्यायालयाने कंपनीस 5 हजार दंडाची शिक्षा सुनावली. कंपनीमार्फत असिस्टंट इंजिनियर यांनी दंडाची रक्कम भरली. ही कारवाई उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा, सहा. वनसंरक्षक व्ही. बी. भडाळे, वाईचे वनक्षेत्रपाल महेश झांजुर्णे घाई यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल भुईंज एस. आर. मोरे, वनरक्षक एल. एस. देशमुख, श्रीमती आर. एस. शेख, एस. बी. आडे यांनी पार पाडली.
वणवा लावल्यामुळे जंगलाची निसर्ग संपदेची हानी होवून पर्यावरणाचे नुकसान होते. त्यामुळे वणवा लावणे अपराध असून तो सिध्द झाल्यास 5 वर्षे कैद किंवा 5 हजार रुपये दंड होवू शकतो. त्यामुळे राखीव वनक्षेत्रात विनापरवाना प्रवेश करणे, वणवा लावणे, शिकार करणे यांसारखे वनगुन्हे करुन नयेत, असे आवाहन वन वागाढघा वतीने करण्यात आले आहे.