
दैनिक स्थैर्य । दि. १७ जुन २०२५ । अकलुज । सुर्यकांत भिसे । आषाढी वारी काळात गेल्या दोन वर्षात संतांच्या पालखी सोहळ्यात चालणाऱ्या सुमारे २४ वारकऱ्यांचा मृत्यू झाला परंतु शासनाच्या मुख्यमंत्री सहायता निधीतून एक रुपयाही मयत वारकऱ्यांच्या वारसाच्या खात्यात जमा झाला नाही त्यामुळे वारकरी वर्गात नाराजीचा सूर दिसून येत आहे.
सन २०२३ मध्ये राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी वारी काळात संतांच्या पालख्यांसोबत चालणाऱ्या वारकऱ्यांचा अपघाती किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसास प्रत्येकी पाच लाख रुपये मदत देण्याची घोषणा केली होती.
गेल्या दोन वर्षात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात ११, संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात ४, संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यात ७, संत मुक्ताबाई महाराज पालखी सोहळ्यात २ अशा जवळपास २४ वारकऱ्यांचा मृत्यू झाला होता.
या मृत वारकऱ्यांची नावे या पालखी सोहळा प्रमुखांनी मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडे दिली होती. परंतु गेल्या दोन वर्षात एक रुपयाही मयत वारकऱ्यांच्या वारसाला मिळाला नाही.
त्यामुळे वारकरी वर्गात नाराजीचा सूर दिसून येत आहे. शासनाने हा निधी तातडीने मयत वारकऱ्यांच्या वारसाच्या खात्यात जमा करावा अशी मागणी पालखी सोहळा प्रमुखांनी केली आहे.