
स्थैर्य, फलटण, दि. २१ : अहमदनगरला आमदार निलेश लंके यांनी उभारलेल्या शरद पवार आरोग्य मंदिर कोविड सेंटर मुळे हजारो रुग्णांना दिलासा मिळालाय. विशेष म्हणजे आमदार लंके स्वतः रात्रंदिवस या कोविड सेंटर मधील रुग्णांची देखभाल करत आहेत. त्यामुळे लंके यांच्या या कामाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. नुकतेच फलटण येथून आलेल्या रुग्णाला व त्याच्या नातेवाईकांना आस्थेवाईकपणे चौकशी करून त्यांच्या उपचाराची व इतर वैद्यकीय सुविधा आमदार निलेश लंके यांनी उपलब्द करून दिलेला व्हिडीओ फलटण तालुक्यामध्ये चांगलाच व्हायरल झाला. त्या नंतर फलटण येथे एक हजार बेड्सचे कोरोना केअर सेंटर उभारण्यासाठी नक्की कोणत्या गोष्टी कराव्या लागतात याची माहिती घेण्यासाठी युवा नेते दिगंबर आगवणे यांनी अहमदनगर येथील आमदार निलेश लंके यांच्या कोरोना केअर सेंटरला सदिच्छा भेट दिली. त्या वेळी फलटण येथे एक हजार बेड्सचे कोरोना केअर सेंटर उभे करण्यासाठी आपण तांत्रीक दृष्टीने जे काही सहकार्य लागेल ते आपण करू अशी ग्वाही आमदार निलेश लंके यांनी दिगंबर आगवणे यांना दिली असल्याची माहिती दिगंबर आगवणे यांनी दिली.
ना कोणता थाट…. ना कोणता रुबाब….. जनसामान्यांचा आधार अशी ओळख निर्माण झालेले राष्ट्रवादीची आमदार निलेश लंके सध्या आपल्या कामामुळे चर्चेत आले आहेत. त्याच कारणही तसेच आहे. लोकप्रतिनिधीचं खर काम काय असते हे निलेश लंके यांनी दाखवून दिले आहे. लंके यांनी पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे तब्बल 1 हजार 100 बेडच कोविड सेंटर उभारले आहेय. त्यात 1000 बेड आणि ऑक्सिजन युक्त 100 बेड आहेत. या प्रमाणेच फलटण येथे एक हजार बेड्सचे कोरोना केअर सेंटर उभारण्याचा मानस दिगंबर आगवणे यांचा असून आगामी काळामध्ये कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेपासून फलटणमधील नागरिकांना वाचवण्यासाठी कोरोना केअर सुरू करणार असल्याचेही दिगंबर आगवणे यांनी सांगितले.
दिगंबर आगवणे यांच्या आयुर उद्योग समूहाच्या माध्यमातून सध्या फलटण येथे १०० बेड्सचे डेडिकेटेड कोरोना हेल्थ केअर सेंटर कार्यरत आहे. या हेल्थ केअर सेंटर मध्ये येणाऱ्या प्रत्येक रुग्णांची ते आस्थेने विचारपूस करतात. तर, स्वतः ताप आणि ऑक्सिजनचे प्रमाण तपासतात. या हेल्थ केअर सेंटर मधून आतापर्यंत शेकडो रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आता कोरोना काळामध्ये राजकारण बाजूला ठेवून आपण सर्वांनी काम करणे गरजेचे आहे. जर फलटण तालुक्यातुन कोरोनाला हद्दपार करायचे असेल तर सर्वांनी एकत्रित येऊनच काम करणे गरजेचे आहे, असे मत दिगंबर आगवणे यांनी स्पष्ट केले.