फलटणला सुरू केलेला लढा कधीही अयशस्वी झाला नाही : मनोज जरांगे – पाटील

विशेष अधिवेशन घेऊन मराठा आरक्षण द्या

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. 20 ऑक्टोबर 2023 | फलटण | फलटणला एक ऐतिहासिक असा इतिहास आहे. फलटणला सुरू केलेला लढा कधीही अयशस्वी झाला नाही. आज फलटणमध्ये एवढी अलोट गर्दी बघून मी भारावून गेलो आहे. मी खरं तर कमी बोलणार होतो पण आता एवढी अलोट गर्दी बघून मी सगळंच बोलणार आहे. कोणता मतदारसंघ कुणाचा बालेकिल्ला आहे; हे आता महत्त्वाचे नाही आता आधी आमचे बालेकिल्ला मजबूत ठेवा तरच तुमचा बालेकिल्ला शाबूत ठेवणार; असे म्हणत जरांगे – पाटील यांनी सरकारकडे विशेष अधिवेशन घेऊन मराठा आरक्षण द्यावे, अशी मागणी केली.

फलटण येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजित सभेत मनोज जरांगे – पाटील बोलत होते. यावेळी प्रचंड मोठ्या प्रमाणावर मराठा समाज बांधव उपस्थित होते.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, “लेकरांच्या वाट्याला आता कष्ट नको. मराठ्यांचं बलिदान वाया जाऊ देणार नाही. मराठा समाजाला आरक्षण ही एकच मागणी आमची आहे. आरक्षण नाही म्हणून आम्हाला नोकऱ्या लागत नाहीत. मराठ्यांना आरक्षण म्हटलं की यांना कायदा, अभ्यास, समित्या लागतात. मात्र आता सरकारला दिलेला वेळ संपला आहे. आता सुट्टी नाही, आता आरक्षण घ्यायचं.”

“आता कायदा पारित करायचा आहे.  समितीला पाच हजार पुरावे मिळाले आहेत. मराठा कुणबी आहे त्यामुळे आता राज्यातील सर्व मराठ्यांना सरसकट ओबीसी प्रमाणपत्र द्यावे. आम्हाला आडमुठी भुमिका घ्यायची नाही. आडमुठी भुमिका घ्यायची असती तर ४ दिवसांच्या मुदतीवर ठाम राहिलो असतो. ४० दिवसांची मुदत दीली नसती”, असे मनोज जरांग पाटील म्हणाले.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, “२४ तारखेपर्यंत कोणालाच काही बोलायचे नाही. सरकारने ठरवले आहे, मराठ्यांनाच मराठ्यांच्या अंगावर सोडायचे. त्यामुळे आता शांत राहायचं. २४ तारखेपंर्यत कोणालाच काही उत्तर द्यायचे नाही. वातावरण दुषित करण्याचा सरकारचा प्रयत्न सुरु आहे. सर्कलमधील प्रत्येक मराठ्याच्या घरी जा. त्यांना आरक्षण कशासाठी पाहीजे ते सांगा. शांततेच युद्धच मराठा आरक्षण मिळवून देईल. २२ तारखेला सांगणार २४ तारखेनंतरचं आंदोलन कसं असणार. मला अजूनही आशा आहे की सरकार २४ तारीख उजडू देणार नाही.”

“मराठा आरक्षणासाठी ५ हजार पानांचे पुरावे देणार आहे. १ पुरावा मिळाला काय १०० मिळाले काय कायदा पारित करण्यासाठी आधार लागतो. एका दिवसात कायदा पारित होतो. राज्यपालांची परवानगी गेऊन विधानसभा घेऊन सरकार कायदा पारित करु शकतो”, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

आता फलटण तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घरामध्ये जाऊन सांगा की; नक्की मराठा आरक्षण का हवे आहे ? त्याची नक्की भूमिका काय आहे. हे सर्व आपण शांततेच्या मार्गाने करायचे आहे; असेही जरांगे – पाटील यांनी स्पष्ट केले.


Back to top button
Don`t copy text!