शेवटच्या माणसाचा आवाज; ज्या राज्यामध्ये ऐकला जातो; ते रामराज्य असते : उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. 17 जानेवारी 2023 | फलटण | फलटणला एक ऐतिहासिक अशी परंपरा आहे. आणि ह्या फलटणमधूनच आज रामायणाचा एक नवीन अध्याय आपण सुरू करत आहोत. ज्याप्रमाणे प्रभू श्रीरामांनी सांगितलं रामराज्य म्हणजे काय तर रामराज्य म्हणजे “शेवटच्या माणसाचा आवाज; ज्या राज्यामध्ये ऐकला जातो; ते रामराज्य असते”. दि. 22 तारखेला अयोध्या मध्ये प्रभू श्रीरामांची मूर्ती अवतरते आहे. भारतामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात एक नवीन अध्याय सुरू होत आहे. त्याच्यामध्ये आता शेवटच्या माणसाच्या विकासाचा विचार होणार आहे. दुष्काळाचा डाग पुसण्याचा काम आज या ठिकाणी आपण सुरू केलं आहे. हा तर वचनपूर्तीचा सोहळा प्रभू श्रीरामांच्या काळात काय म्हटलं जायचं “रघुकुल रीत सदा चली आई; प्राण जाये; पर वचन न जाये” त्यामुळे हे जे वचन तुम्हाला खासदार रणजितसिंह यांनी व आमदार जयकुमार गोरे यांनी दिले होते ते म्हणजे तुमचं हक्काचं पाणी तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याची वचनपूर्ती करून फलटणमध्ये एक नवीन अध्याय सुरु होत आहे; असे मत उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा वचनपुर्तीसोहळा भाजपा नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. त्यावेळी ना. देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार रणजितसिंह मोहिते – पाटील, माजी मंत्री सदाभाऊ खोत, आमदार जयकुमार गोरे, आमदार राम सातपुते, आमदार समाधान आवताडे, आमदार राहुल कुल, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार बबनदादा शिंदे, आमदार शहाजी पाटील, आमदार राजाभाऊ राऊत, माजी आमदार रश्मी बागल, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, प्रसिद्ध उद्योजक राम निंबाळकर, यांच्यासह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

दुष्काळी तालुका म्हणून डाग आता कायमस्वरूपी पुसणार

सातारा व सोलापूर जिल्ह्यामधील म्हणजेच माढा लोकसभा मतदारसंघ हा दुष्काळी मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. यामध्ये येणारे तालुके त्यात विशेतः फलटण, माळशिरस, सांगोला, करमाळा हे दुष्काळी तालुके म्हणून ओळखले जातात. नीरा देवधारच्या कालव्याचा शुभारंभ आपण आज करीत आहोत; त्यामुळे नक्कीच ह्या तालुक्याचा दुष्काळी तालुका म्हणून असलेला डाग कायमस्वरूपी पुसणार आहे; असे मत उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

अनेक प्रकारच्या चोऱ्या ऐकल्या होत्या पण पाण्याची चोरी पाहिली नव्हती

मी राज्यामध्ये गृहमंत्री म्हणून कामकाज पाहत होतो व आता सुद्धा आहे. राज्यामध्ये कार्यरत असताना अनेक प्रकारच्या चोऱ्या ऐकल्या होत्या; पण पाण्याची चोरी पाहिली नव्हती. जे तुमच्या हक्काचे पाणी आहे; ते तुमच्या पर्यंत पोहचल जाणार आहे. हक्काचे पाणी तुमच्या शिवारात येण्यासाठी तब्बल 23 वर्ष लागली आहेत. पण मला हे निश्चितपणे सांगितलं पाहिजे कि; खासदार रणजितसिंह, आमदार जयकुमार गोरे, शहाजी बापू पाटील यांनी जो संघर्ष केला आहे. पण याचं श्रेय हे तुम्ही सर्वांनी मला दिले आहे परंतु हे खरं श्रेय या जनतेने तुम्ही दिल पाहिजे कारण ह्या जनतेनेच तुम्हाला निवडून दिलं म्हणून या जनतेचा श्रेय आहे; असे मत उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

दुष्काळाचे दुःख मी ओळखतो आणि तेच दुःख मला कुठेतरी या दुष्काळी भागात पाहायला मिळाल आहे

सातारा व सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील सर्व सिंचन प्रकल्प पूर्णत्वास जाण्यासाठी जोपर्यंत काम पूर्ण होत नाही; तो पर्यंत पैशाची कमतरता पडू देणार नाही. जेवढे पैसे लागतील; तेवढे पैसे या ठिकाणी देण्याचं काम हे आपण निश्चितपणे करणार आहे. या सगळ्या भागांमध्ये या ठिकाणी वेगवेगळे धरण असतील या सगळ्या धरणांच्या कामाला चालना देण्याची संधी मला मिळाली; पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाणी आहे. पश्चिम महाराष्ट्राचे जे प्रकल्प आहेत. या सगळ्या प्रकल्पांना चालना देण्याची संधी मला मिळाली; आणि खऱ्या अर्थाने सांगोला तालुका सर्वात जास्त दुष्काळग्रस्त होता. आता सांगोल्यामध्ये एवढं पाणी पोहचणार आहे त्यामुळेच की काय लोकांचं वय वाढत आहे परंतु आमच्या शहाजी बापूंचं वय कमी व्हायला लागले आहे. मी देखील ज्या विदर्भातला येतो दुष्काळाचे दुःख मी ओळखतो आणि तेच दुःख मला कुठेतरी या दुष्काळी भागात पाहायला मिळाल आहे; असे मत उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

देशातील पाहिलं कालवा जोड प्रकल्प माढा मतदारसंघात

केंद्र सरकारच्या प्रकल्पांना केंद्र सरकारचा निधी मिळण्याकरता ज्या प्रकारचा पाठपुरावा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केला आहे; मी त्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन करतो. त्याने सातत्याने केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांच्या पाठीमागे लागून लागून आणि या ठिकाणी केंद्र सरकारचा आज देशातला पहिलाच जोड कालवा प्रकल्प देखील आपण या भागामध्ये करतोय. नदी जोड प्रकल्प झाले आता कालवा जोड प्रकल्प या ठिकाणी होत आहे. नीरा देवधर आणि धोम बलकवडी एका कालव्यातलं दुसऱ्या कालव्यामध्ये पाणी देऊन जिथे चारमाही पाणी असते त्याठिकाणी आता आठमाही पाणी आणण्याचं काम देखील आपण करत आहे; असे मत उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

सिंचनाच्याप्रमाणे रस्ते व रेल्वेचे जाळे सुद्धा माढा मतदारसंघात उभारले आहे

या सर्व गोष्टी करत असताना आपण केवळ सिंचन प्रकल्प करीत आहोत. त्याच प्रमाणात रस्त्यांचं जाळं देखील या ठिकाणी तयार झालं आहे. आज हा जो माढा मतदार संघ आहे. देशामध्ये जे नवीन रस्ते झाले त्याच्यामध्ये देशात आठव्या क्रमांकावर आज आपल्या माढा मतदार संघाला इतक्या मोठ्या प्रमाणात मोदीजींनी गडकरी साहेबांनी आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी रस्ते देखील उपलब्ध करून दिले आहेत. रेल्वेचा प्रश्न होता रेल्वे लाईन तयार होती रेल्वे चालत नव्हती. कोणी अडवली होती; मला माहित नव्हतं पण आज ती रेल्वे देखील चालली आहे आणि नवीन लाईनला देखील पैसे मिळाले आहेत; असे मत उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

पुढची सगळी इंडस्ट्री सातारा जिल्ह्यामध्ये येणार

एमआयडीसी कारण शेवटी आज आपण नवीन जो कॉरिडॉर तयार करतो आहे; मुंबई – बंगलोर कॉरिडॉर या कॉरिडॉरमुळे पुढची सगळी इंडस्ट्री सातारा जिल्ह्यामध्ये येणार आहे. या ठिकाणी नवीन एमआयडीसीचा पाठपुरावा खासदार रणजितदादा करत होते. दुसरी एमआयडीसी त्याचा पाठपुरावा आमदार जयाभाऊ करत होते. तिसरी एमआयडीसी याचा पाठपुरावा आमदार शिवेंद्रसिंहराजे करत आहेत. या सगळ्या एमआयडीसीला त्या ठिकाणी मान्यता देऊन आणि मोठ्या प्रमाणात उद्योग आज या भागामध्ये आणण्याचं काम आपण करत आहे. पुढच्या पाच ते सात वर्षांमध्ये एक नवीन औद्योगिक सिस्टीम या भागामध्ये तयार झालेली आपल्याला दिसेल. आमचे मुलं शिकतात इंजिनिअर होतात; पण कामाकरता बंगलोरला, पुण्याला वेगवेगळ्या ठिकाणी चालले आहेत. आता सातारा जिल्ह्यातल्या मुलांना कुठेही जायचं कारण राहणार नाही. विशेतः दुष्काळी भागातल्या मुलांना कुठे जायचं काम नाही; ही सगळी इंडस्ट्री हे सगळे उद्योग आता आपल्या तालुक्यांमध्ये या ठिकाणी येणार आहेत. आणि म्हणून आज एवढंच सांगायला मी आलो आहे ते म्हणजे “जे काम करतात; त्यांच्या पाठीशी तुम्ही उभे राहा!; जे काम करतात; त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या” ही सगळी काम यापूर्वी करणं शक्य होतं पण ती झाली नाहीत; असे मत उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

मातीशी गद्दारी करत काही भागाला पाणी देण्यासाठी मुद्दामून ह्या भागाचे पाणी अडवून ठेवले

ह्या फलटण तालुक्यासह भागामध्ये अनेक जाणते राजे गेल्या 25 वर्षे झाले आहेत. याच मातीमध्ये जलसंपदा खाते असताना ह्या मातीशी गद्दारी करत काही भागाला पाणी देण्यासाठी मुद्दामून ह्या भागाचे पाणी अडवून ठेवले. ह्या भागातील कॅनॉलचे कामकाज पूर्ण होऊ दिले नाही; आणि हाच प्रश्न घेवून ह्या मातीतील मर्द गडी खासदारकीच्या निवडणुकीत उतरला आणि त्याचेच आज भूमिपूजन आहे; असे मत आमदार जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले.

जनतेला दिलेले सर्व शब्द उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालीच पूर्णत्वास जात आहेत

निरा – देवधर प्रकल्पामुळे खंडाळा, फलटण, माळशिरस व सांगोला तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेत्र हे ओलिताखाली येत आहे. मी लोकसभेला उभा राहताना उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस आपण दिलेले सर्व शब्द त्यामध्ये निरा – देवधर प्रकल्प, फलटण रेल्वे व नाईकबोंबवाडी येथे असणारी MIDC हे सर्व प्रश्न आता मार्गी लागले आहेत. लोकसभेला उभे राहताना माढा लोकसभा मतदारसंघातील जनतेला दिलेले सर्व शब्द उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालीच पूर्णत्वास जात आहे; असे मत यावेळी खासदार रणजितसिंह यांनी व्यक्त केले.

यावेळी बोलताना खासदार रणजितसिंह म्हणाले की; केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून फलटण, खंडाळा, माण, खटाव, माळशिरस, सांगोला ह्या तालुक्यात गेले अनेक वर्षे प्रलंबित राहिलेले प्रश्न आता मार्गी लागले आहेत. माढा लोकसभा मतदारसंघातील एकही सिंचन योजना आता प्रलंबित राहिली नाही. फलटणमध्ये ज्या प्रकारे आज निरा – देवधरचा प्रकल्प मार्गी लागला आहे. तसाच माळशिरस येथे सुद्धा आगामी काळामध्ये एक भव्य – दिव्य कार्यक्रम आपल्या हस्ते करायचे आहे.

उद्या कुणालाही तिकीट द्या; फलटण तालुक्यातून 80 हजारांचे लीड देणार

उद्याच्या काळामध्ये असणाऱ्या निवडणुकीत कुठल्याही दगडाला जरी शेंदूर लावला; त्याला गणपती करायचे काम आम्ही सर्व जण करणार आहोत. आज माझी पत्नी सौ. जिजामला व माझे बंधू समशेरसिंह यांच्यासह फलटण तालुक्यातील जनतेला साक्षी देवून मी आपणांस आश्वासन देतो की; उद्याच्या काळामध्ये तुम्ही कुणालाही तिकीट द्या; त्याला फलटण तालुक्यातून 70 ते 80 हजारांचे लीड देण्याचे काम आम्ही सर्व जण मिळून करू; असे मत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.

ना. देवेंद्रजी आपल्या प्रेमापोटी आज एक कडू गोळी गिळत आहे

राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यासह माढा लोकसभा मतदारसंघातील सर्व कामे ही मार्गी लावली आहेत. या सर्व गोष्टींमुळे आमचे आपल्यावर प्रेम आहे. ना. देवेंद्रजी तुमच्यावर असलेल्या प्रेमामुळे आज एक कडू गोळी गिळत आहे; असे मत खासदार रणजितसिंह यांनी व्यक्त केले.

यावेळी ऑनलाइन स्वरूपात बटण दाबून निरा – देवधर प्रकल्प, फलटण ते बारामती रेल्वे व नाईकबोंबवाडी MIDC प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी ना. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्त्यांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.


Back to top button
Don`t copy text!