
स्थैर्य, दहिवडी, दि.१५: माण तालुक्यात पावसाने हाहाकार झाला असुन माण नदी दुथडी भरून वाहत आहे. अचानक काल रात्री पुर आल्याने माण नदीच्या कडेला असणारे शेतजमीन वाहून गेली. तर म्हसवड येथील माण नदीच्या पात्राजवळ रिंगावण पेठ परिसरातील हॉटेल व पान टपरी,रसवंती गृह पुरात वाहून गेली आहेत.
या मुळे हातावर पोट असणारे व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे.
रात्रभर झालेल्या पावसाने दिघंची, आटपाडी, वरकुटे रस्त्यावरील पुल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.
वरकुटे भागात दोन जण वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
परतीच्या पावसाने सर्वत्र हाहाकार माजल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले असून खरीपाचे प्रचंड नुकसान ,काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे तर काही ठिकाणी रब्बी हंगाम लांबण्याची शक्यता
माण तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून त्याचा फटका शेतकरी वर्गाला मोठ्या प्रमाणात बसणार आहे, खरिपाचा हंगाम पिके काढण्याच्या तयारीत असून बाजरी, मूग, घेवडा ,सोयाबीन ,मका ही पिके पूर्णपणे उध्वस्त झाली आहेत,
त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे .त्याचबरोबर आता रब्बीचा हंगाम सुरू झाला असून खरीपाची पिके निघाली नसल्यामुळे रब्बीचा हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यता आहे, प्रामुख्याने काळी कसदार जमिनीमध्ये पाणी मोठ्या प्रमाणात मुरले असल्यामुळे पेरणीयोग्य जमीन होणे साठी दहा ते पंधरा दिवस थांबावे लागेल हलक्या जमिनीमध्ये हलक्या जमिनीमध्ये चार ते पाच दिवस लागतील, शेतकऱ्यांसाठी आर्थिक गणित वाढणार आहे, प्रामुख्याने व्यापारी पिकामध्ये येणारे पैसे खरिपामध्ये मिळतात खरीपाचा सीजन वाया गेल्यामुळे आर्थिक फटका मोठ्या प्रमाणात बसणार आहे रब्बी हंगामासाठी गहू ज्वारी हरभरा ही पिके प्रामुख्याने घेतली जातात सध्या ज्वारी पेरणी होणे अतिशय गरजेचे आहे, तरच हंगाम साधता येईल , दुष्काळी पट्ट्यात परतीच्या पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली असून सलग तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने माणच्या दुष्काळी पट्टयाला झोडपून काढले. दोन दिवस झालेल्या पावसाने ओढेनाले, बंधारे पूर्ण क्षमतेने वाहत असून तालुक्यातील बहुतांश भागातील जलसाठेही हाऊसफुल्ल झाले आहेत. तसेच शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील वापशानुसार ज्वारी पिकाच्या पेरण्या उरकल्या आहेत, या पेरण्यावर सुद्धा पाणी फिरले आहे ,या पावसाने दुबार पेरण्याचे संकट उभे राहिले आहे.
यावर्षी माण तालुक्यातील दुष्काळी पट्ट्यात वरुणराजाने चांगलीच कृपादृष्टी केली असून परतीच्या पावसाचा जोरही कायम आहे. साधारण पंधरा दिवस विश्रांती घेतलेल्या वरुणराजाने दुष्काळी भागात पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. शनिवारी दुपारी चार वाजल्यापासून माणमधील म्हसवड पासून शेनवडी पर्यंतच्या पट्ट्याला ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने झोडपून काढले. याशिवाय आंधळी, मलवडी, दहिवडी, बिजवडी परिसरातही दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. शनिवारी रात्रीही तालुक्याच्या अनेक गावात पावसाची रिपरिप सुरूच होती. मात्र बुधवारी दुपारपासून म्हसवड, गोंदवले, नरवणे, दहिवडी भागात पावसाची रिमझिम सुरूच होती तर माण उत्तरच्या दुष्काळी पट्ट्यातील वावरहिरे, शिंगणापूर, मोही, मार्डी, खुटबाव, भालवडी, राणंद या गावांसह आंधळी, मलवडी, बिजवडी, पाचवड परिसराला मात्र ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने झोडपून काढले. शिंगणापूर परिसरातही बुधवारी रात्रभर झालेल्या दमदार पावसामुळे परिसरातील तलाव, बंधारे पूर्ण क्षमतेने भरले असून ऐतिहासिक पुष्कर तलावही हाऊसफुल्ल झाला आहे. तर मुसळधार पावसामुळे शंभू महादेवाच्या डोंगरातून अनेक लहानमोठे धबधबे कोसळत आहेत. रविवारी रात्री उशीरापर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती. दोन दिवस झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी शेतांच्या ताली फुटून पिके वाहून गेली आहेत तर ओढे, नाले, बंधारे हाऊसफुल्ल झाले आहेत. माणच्या दुष्काळी बहुतांश गावांना दोन दिवस झालेल्या दमदार पावसाने झोडपून काढल्याने माणगंगा नदीपात्रातील पाण्यातही वाढ झाली असून तालुक्यातील आंधळी, पिंगळी, राणंद, शिंगणापूर, यासारखे मोठे तलावही पूर्ण क्षमतेने भरले आहेत. परतीच्या पावसामुळे शेतकरी वर्गाची धांदल उडाली असून काही ठिकाणी कांदा, बाजरी, घेवडा पिकांचे नुकसान झाले आहे.
पुर्व भागात प्रचंड नुकसान
माण तालुक्यातील पुर्व भागात भुईमूग, कांदा,मका या पिकांचे नुकसान झाले आहे. सलग चार वर्षे दुष्काळ पडला होता. या दुष्काळातून कसाबसा सावरणाऱ्या माण देशातील बळीराजाचे या अवकाळी पावसाने कंबरडे मोडले आहे. मटकी,बाजरी,पिके रानात पावसाने कुजु लागल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.