
दैनिक स्थैर्य | दि. ६ एप्रिल २०२४ | फलटण |
पांगरी (तालुका माण) येथील आदर्श माता स्व. गजराबाई नारायण आवळे यांनी खडतर परिस्थितीवर मात करून कुटुंबाचा गाडा हाकला व मुलांना उच्च शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे केले. मुलांनीही स्वतःचे आपापल्या क्षेत्रात स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले. आई-वडिलांनी दिलेले सामाजिक व शिक्षणरूपी संस्कार ते विसरले नाहीत. त्यामुळेच आईच्या स्मरणार्थ पहिल्या पुण्यस्मरणानिमित्त पांगरी येथे गुरुवार, दि. ११ एप्रिल २०२४ रोजी ‘मातृ देवो भव’ या विषयावर ज्येष्ठ विचारवंत व व्याख्याते माजी प्राचार्य रविंद्र येवले यांचे व्याख्यान, ‘आदर्श आई पुरस्कार’ व ‘गुणवंतांचा सत्कार’ या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती माणदेशी साहित्यिक ताराचंद्र आवळे व प्रा. सुरेखा आवळे यांनी दिली आहे.
यावेळी रुक्मिणी आण्णा दडस, इंदुबाई बाबुराव गायकवाड, लक्ष्मी यशवंत खरात, बायडाबाई आप्पा दडस, लक्ष्मी सोनबा तांबे, पार्वती काकासाहेब गायकवाड, सुलोचना जयवंत काळे, छलाबाई तात्याबा गायकवाड या मातांना ‘आदर्श आई’ हा पुरस्कार शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
विशेष नैपुण्याबाबत प्रा. डॉ. अनिल दडस, डॉ. प्राजक्ता दडस, डॉ. स्वाती खरात, कु.ऋतुजा वामन माने तसेच इयत्ता दहावी प्रथम तीन क्रमांक तन्वी गायकवाड, आरती दडस व जुईली राऊत यांना स्मृतिचिन्ह व विशेष सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
आईच्या पहिल्या पुण्यस्मरणार्थ आयोजित केलेल्या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमास उपस्थित रहावे व कार्यास बळ द्यावे, असे आवाहन संयोजक माणदेशी साहित्यिक ताराचंद्र आवळे व कै. नारायण गेणू आवळे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दिलीप आवळे यांनी केले आहे.