
स्थैर्य, सातारा, दि. १९: सातारा तालुक्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे उरमोडी धरणाचे चार वक्र दरवाजे अंशतः उचलण्यात आले आहेत . धरणातून 950 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याची माहिती उरमोडी धरण व्यवस्थापनाने दिली असून उरमोडी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे .
जिल्ह्यात मान्सूनचे जोरदार आगमन झाले आहे. गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे बरसत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच ओढे नाले, धबधबे ओसंडून वाहू लागल्याने धरण क्षेत्रातही पाण्याची चांगलीच आवक वाढली आहे. उरमोडी धरण परिसरातही मुसळधार पाऊस सुरु असल्याने धरणाच्या चारही वक्र दरवाजामधून विसर्ग उरमोडी नदी पात्रात सोडण्यात आला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जिल्हय़ात हाहाकार माजवला आहे. परळी खोऱ्यात पावसाने संततधार सुरु ठेवल्याने उरमोडी धरण क्षेत्रात पाण्याची आवक वाढल्याने गुरुवार 17 जून रोजी रात्री 11 वाजता चारही वक्रद्वार 0.25 मी उचलून 750 व विद्युत गृह 200 असा एकूण 950 क्यूसेक विसर्ग उरमोडी नदी पात्रात सुरू करण्यात आला. तसेच पावसाचा मारा कायम असल्याने पाणी पातळीमध्ये वाढ होत असल्याने शुक्रवार 18 जून रोजी सकाळी 9 वाजता वक्रद्वार क्र 1 व 4 हे 0.25 मी वरून 0.50 मी करण्यात आली. (गेट क्र 1 व 4 हे 0.50 मी, गेट क्र 2 व 3 हे 0.25 मी) सध्या उरमोडी नदी पात्रात होत असलेला एकूण विसर्ग 1413 क्यूसेक, कालवा 100 क्यूसेक, धरणातून होत असलेला एकूण विसर्ग 1513 क्यूसेक इतका असून, याकालावधीत उरमोडी नदीपात्रातून ये-जा करण्यास मज्जाव करण्यात आला आहे.