
स्थैर्य, 11 फेब्रुवारी, सातारा : पाटण विधानसभा मतदार संघातील नागरिकांचे प्रश्न जलदगतीने जागेवर सोडविण्यासाठी पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी हा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमांतर्गत प्राप्त अर्जांवर विभाग प्रमुखांनी सकारात्मक निर्णय घेऊन अर्जदारास दिलासा द्यावा, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी उपक्रमांतर्गत प्राप्त अर्जांवर करण्यात आलेल्या कार्यवाहीचा पालकमंत्री श्री. देसाई यांनी आढावा घेतला. या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत शिंदे, अभय काटकर, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्यासह विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी उपक्रमांतर्गत 156 गावांना भेटी देऊन 5 हजार 86 अर्ज प्राप्त, 2 हजार 400 अर्जावर कार्यवाही करण्यात आली असून 1 हजार 696 अर्ज प्रलंबित आहेत. या प्रलंबित अर्जांवर सकारात्मक निर्णय घ्यावा. ज्या अर्जांवर निर्णय जिल्हास्तरावर घेता येईल असे जिल्हास्तरावर पाठविण्यात यावेत. तसेच ज्या अर्जदाराचे काम नियमात बसत नाही त्या अर्जदाराला लेखी कळविण्यात यावेत. या कामासाठी तालुकास्तरावर प्रांताधिकारी सोपान टोनपे व जिल्हास्तरावर निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी समन्वय अधिकारी म्हणून काम करावे, असेही निर्देश पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेंतर्गत पाटण तालुक्यातील महिला लाभार्थ्यांचे ई-केवायसी चुकली आहे. त्यांची ई-केवायसी दुरुस्त करावी, असे निर्देश देऊन पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, नवीन शिधापत्रिकेसाठी अर्ज आले आहेत या अर्जांवर एक महिन्याच्या आत कार्यवाही करावी. पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी उपक्रमाला पाटण तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांना सोयी-सुविधा व विविध योजनांचा लाभ देण्यासाठी प्रशासनाचा सहभाग महत्वाचा आहे. त्या दृष्टीने पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी उपक्रमांतर्गत प्राप्त अर्जांचा तातडीने निपटरावा करावा, असेही निर्देश पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिले.
