
स्थैर्य, 27 मार्च, सातारा : जिल्ह्यात गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार ग्राहकांना मुदतीत गॅस मिळेल लोकांना पॅनिक होऊन गॅस एजन्सीसमोर नाहक रांगा लावू नयेत तसेच पेट्रोल डिझेलचाही पुरेसा साठा उपलब्ध आहे. भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम, व इंडियन ऑइल या कंपन्यांनी जिल्ह्यातील वितरकांना एक दिवसाचे क्रेडीट देऊन पुरवठा करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे जिल्ह्यात कुठेही टंचाई नाही, याबाबत लोकांनी आश्वस्त रहावे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहील अशी ग्वाही पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी दिली.
जिल्ह्यातील पेट्रोल, एलपीजी तसेच इतर अत्यावश्यक सेवांच्या पुरवठ्या संदभार्त पालकमंत्री श्री. देसाई यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, अपर जिल्हाधिकारी मल्लीकार्जून माने, जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांच्यासह पुरवठाधारक कंपन्यांचे प्रतिनिधी, सर्व प्रांताधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, पेट्रोल, एलपीजी, गॅस या सर्वांचा साठा जिल्ह्यात पूरेसा असून रिफिलींगची व्यवस्थाही अंत्यंत चांगली आहे. त्यामुळे जिल्ह्यात या जीवनावश्यक वस्तुंची टंचाई नाही, लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, पेट्रोल पंप, गॅस एजन्सी यांच्यासमोर अकारण रांगा लावू नयेत. वाहनांमध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त इंधन भरू नये. किंवा त्याचा घरात कॅनमध्ये साठा करुन आपला जीव धोक्यात घालू नये, सर्वत्र परिस्थीती नियंत्रणात आहे. साठा करण्याची गरज नाही.
सातारा जिल्ह्यात भारत पेट्रोलियम चे 99 हिंदुस्तान पेट्रोलियमचे 102 आणि इंडियन ऑइल चे 136 असे 337 पेट्रोल पंप आहेत. या तिन्ही कंपन्यांच्या मिळून 89 गॅस एजन्सी असून 9 लाख 64 हजार 552 गॅस ग्राहकांची संख्या आहे. साठेबाजी किंवा काळाबाजार होवू नये यासाठी तहसीलदार स्तरांवर भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल टंचाईचा गैरफायदा घेऊन साठेबाजी आणि काळाबाजार होवू नये यासाठी एक मार्च ते 25 मार्च या कालावधीमध्ये 640 ठिकाणी जिल्ह्यात धाडी घालण्यात आलेल्या आहेत.

