‘स्थैर्य’च्या वृत्ताचा महावितरणला दणका; सणासुदीतील वीजपुरवठा अखेर सुरळीत

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली बातमीची दखल, कर्मचाऱ्यांना दिले सतर्कतेचे आदेश; नागरिकांमधून समाधान व्यक्त


स्थैर्य, फलटण, दि. 31 ऑगस्ट : ऐन गौरी-गणपती सणाच्या काळात फलटण शहर आणि तालुक्यात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. या समस्येला ‘दैनिक स्थैर्य’ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध करून वाचा फोडली होती. या वृत्ताची तातडीने दखल घेत, वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित विभागाला सक्त सूचना दिल्या असून, अखेर फलटणमधील वीजपुरवठा सुरळीत झाला आहे. यामुळे नागरिकांमधून, विशेषतः महिला वर्गातून, समाधानाचे वातावरण आहे.

‘दैनिक स्थैर्य’ने आपल्या वृत्तात, गौरी आगमनाच्या तोंडावर वीजपुरवठा खंडित होत असल्याने महिलांची होणारी गैरसोय आणि ‘श्रीं’च्या मूर्ती अंधारात राहत असल्याने भाविकांच्या भावना तीव्र शब्दांत मांडल्या होत्या. या बातमीची वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली. त्यांनी तात्काळ फलटण विभागातील अधिकाऱ्यांना निर्देश दिले असून, सणासुदीच्या काळात वीजपुरवठा अखंडित राहील याची खात्री करण्यास सांगितले आहे. तसेच, काही तांत्रिक अडचण आल्यास, कर्मचाऱ्यांनी प्राधान्याने दुरुस्ती करून वीजपुरवठा पूर्ववत करावा, अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

‘स्थैर्य’च्या या बातमीमुळे प्रशासकीय यंत्रणा गतिमान झाली आणि नागरिकांची मोठी गैरसोय दूर झाली. वीजपुरवठा सुरळीत झाल्याने, शहरातील अनेक महिलांनी आणि गणेश भक्तांनी ‘दैनिक स्थैर्य’चे अभिनंदन करून आभार मानले आहेत. वाचकांच्या प्रश्नांना वाचा फोडून सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या ‘स्थैर्य’च्या विधायक पत्रकारितेच्या परंपरेतील हे आणखी एक यश मानले जात आहे.


Back to top button
Don`t copy text!