6 जूनला राज्यभरात साजरा होणार ‘शिव स्वराज्य दिन’; ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती


स्थैर्य, कोल्हापूर, दि.४: शिवराज्याभिषेक दिनी म्हणजेच ६ जून रोजी राज्यभरात ‘ शिव स्वराज्य दिन’ साजरा केला जाणार आहे. ग्रामविकास मंत्रालयाचा महत्त्वाचा निर्णय असून या दिवशी गुढी उभारून आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्राचा जागर करुन हा दिवस साजरा केला जाणार आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मंत्री मुश्रीफ म्हणाले की, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा आणि जीवनचरित्राचा जागर व्हावा यासाठी शासनाने शिव स्वराज्य दिन साजरा करण्याचे निश्चित केले आहे. यादिवशी राज्यातील ३० हजार ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्हा प्रशासनाची सर्व प्रमुख कार्यालयांच्या ठिकाणी गुढी उभारली जाणार आहे. सर्व पदाधिकारी, कर्मचारी यांनी गुढीसमोर नतमस्तक होऊन शिवरायांचे स्मरण करावे, महाराष्ट्र गीत, राष्ट्रगीत, शिवरायांचे विचार मांडावेत. या दिवशी शासकिय सुट्टी आली तरी हा दिवस साजरा करणे बंधनकारक राहील, असेही त्यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!