क्रांतीसूर्याची,प्रज्ञासूर्याची सावली : रमाई

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि.०७ फेब्रुवारी २०२२ । फलटण । करुणेची कविता तू मावत नाही कवितेत ही
शब्दांशिवाय मैफील तू मावत नाहीस संगीतातही
डोळ्यांमध्ये व्याकूळ सागर मावत नाही सागरातही
आर्ततेची सदाफुली तू, मावत नाहीस अश्रूतही
सुर्यासोबत संसार तुझा चांदणे झालीस आगीतही……..

कविवर्य डॉ.यशवंत मनोहर यांच्या या ओळी रमाईच्या त्यागाची,समर्पणाची, आर्ततेची आठवण करून देतात.आज ७ फेब्रुवारी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची सावली, अर्धांगिनी, स्फूर्ती रमाई अर्थात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची रामू म्हणजेच रमाबाई भीमराव आंबेडकर. या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या पत्नीच. यांची आज जयंती.त्यानिमित्ताने रमाईच्या त्यागाला व कार्यकर्तृत्वाला विनम्र अभिवादन!!!

डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेताना रमाईचे त्यांच्या जीवनातील योगदान,त्याग आणि समर्पण याचा उल्लेख केल्याशिवाय हा प्रवास पूर्ण होऊच शकत नाही.रमाई चे संपूर्ण आयुष्य हे त्यागाचे आणि आपल्या युगपुरुषाच्या जडणघडणीतील सुवर्ण पान आहे.अत्यंत हालआपेष्ठा,दारिद्र्य आणि दैन्य यातून आयुष्याचा खडतर प्रवास करत रमाईने अखेरच्या क्षणापर्यंत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना साथ दिली.

रमाईचा जन्म कोकणातील दापोली तालुक्यातील वणंदगावी रुक्मिणी आणि भिकू धोत्रे या स्वाभिमानी आणि अत्यंत प्रामाणिक आई वडिलांच्या पोटी झाला.भिकू धोत्रे हे बंदरावर मासोळी वाहण्याचे काम करायचे. लहान असताना आधी आईचे व नंतर वडिलांचे छत्र हरपल्याने धाकटी बहीण गौरा व भाऊ शंकर हे अजाण होते. या संपूर्ण भावंडांची जबाबदारी या छोट्या चिमुकल्या रमाईवर येऊन पडली.असा कठीण परिस्थितीत आपल्या वलंगकर काका आणि गोविंदपुरकर मामांच्या सोबत मुंबईला भायखळा मार्केटच्या चाळीत रहायला गेल्या. आता संपूर्ण कुटुंबाची जबाबदरी काकांच्यावर पडल्यामुळे आपण ही हातभार लावावा यासाठी ती कायम धडपडायची.कुटुंबातील घरकामे लगोलग उरकून ती कायम कामात मदत करत राहिली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे वडील सुभेदार रामजी आंबेडकर हे लष्करी अधिकारी होते.आपल्या भीमरावास सुशील मुलीच्या शोधात होते. सुभेदारांना भायखळा मार्केटजवळ राहणाऱ्या वलंगकरांकडे लग्नाची मुलगी असल्याचे समजले. त्यांना रमा पसंत पडली.पुढे रमाई व भीमरावांचे लग्न भायखळ्याच्या भाजी मार्केट मध्ये १९०६ या वर्षी झाले. विवाहप्रसंगी बाबासाहेबांचे वय १४ वर्षे तर रमाईचे वय ९ वर्षे होते.लग्न अतिशय साध्या पद्धतीने पार पडले.

अत्यंत हाल अपेष्ठा सहन करत रमाईनी क्रांतीसुर्यासोबत संसार केला.परंतु कोणतीही तक्रार न करता त्यांनी कुटुंबाचा भार उचलून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना ही शिक्षणासाठी मदतच केली.१९२३ साली बाबासाहेब लंडनला गेले, त्यावेळी रमाईची खूप वाताहत होत होती. ती दुष्काळाच्या आगीत होरपळत होती. बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांना रमाईचे हाल पहावले नाहीत. त्यांनी काही पैसे जमा केले. व ते पैसै रमाईला देऊ केले. तिने त्यांच्या भावनांचा आदर केला पण ते पैसे घेतले नाहीत. स्वाभिमानी पतीची ती स्वाभिमानी पत्नीष जिद्दीने अडचणींशी सामना करत होती. आपल्या चिमुकल्यांचे मृत्युसत्र, दुःख, त्याग, समजूतदारपणा, कारुण्य, उदंड मानवता व प्रेरणास्थान म्हणजे रमाई. रमाईने अनेक मरणे पाहिली. प्रत्येक मरणाने तीही थोडी थोडी मेली. मरण म्हणजे काय कळत नव्हते त्या वयात, आई वडिलांचा मृत्यू १९१३ साली, रामजी सुभेदारांचा मृत्यू १९१४ ते १९१७ साली, बाबासाहेब अमेरिकेला असताना रमेशचा मृ्त्यू, ऑगस्ट १९१७ मध्ये बाबांची सावत्र आई जिजाबाईचा मृत्यू. पाठोपाठ मुलगी इंदू, बाबासाहेबांचा मोठा भाऊ आनंदराव व आनंदरावांचा मुलगा गंगाधरचा मृत्यू, १९२१ बाबासाहेबांचा मुलगा बाळ गंगाधर व १९२६ मध्ये राजरत्नाचा मृत्यू पाहिला. असे अनेक आघात पचवत ती आयुष्य जगली.

एकाबाजूला कुटुंबाचा भार वाहत असताना होणारी ओढाताण आणि पैशांची चणचण यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणात तिने कधीही व्यत्यय येऊ दिला नाही की कधी तिने पत्र लिहून त्यांना कळविले. परदेशात जाऊन ज्ञान आत्मसात करणाऱ्या बाबासाहेबांना मात्र रमाईने कधी आपल्या दु:खाची झळ पोहचू दिली नाही. पती परदेशात शिक्षणासाठी गेले. रमाई एकट्या पडल्या. घर चालवण्यासाठी त्या पहाटे लवकर उठून शेण गोवर्यान वेचल्या.त्यातून येणारे पैसे त्यात घरखर्च चालवून त्यातील काही रक्कम त्यांनी बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी दिली.शेण गोळा करण्यासाठी पोयबावाडीतून दादर माहीम पर्यंत त्या पायपीट जात असत. बॅरिस्टराची पत्नीा शेण वेचते म्हणून लोक नावे ठेवतील. म्हणून पहाटे सूर्योदयापूर्वी व रात्री ८ नंतर गोवर्याक थापायला वरळीला जात असत. तिने आपल्या वागण्यातून कधीही डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव जाऊ दिले नाही.सतत होणारे मृत्यू यामुळे त्यांनी मुलांसाठी उपास धरले.त्यामुळे कायम कष्टात आयुष्य घालवणाऱ्या रमाई यांचे शरीर त्यांना साथ देत नव्हते.त्या सतत आजारी पडायच्या. अस्पृश्यतेच्या अग्निदिव्यातून होरपळून निघालेले बाबासाहेब आता समाजाला अस्पृश्यतेच्या रोगातून मुक्त करण्यासाठी अर्धपोटी उपाशी राहून १८-१८ तास अभ्याास करत आहेत.तेव्हा माझी ही साथ त्यांना मिळावी.त्यांनी आपल्या जनतेची गुलामगिरीतून दास्यातून मुक्तता करावी असे तिलाही मनोमन वाटायचे.त्यामुळेच तिने कोणतीही तक्रार न करता वेळो वेळी आपल्याल निष्ठेने, त्यागाने आणि कष्टाने स्वतःच्या संसाराचा गाडा हाकलून बाबासाहेबांना ध्येय गाठण्यासाठी मदत केली.

डॉ. बाबासाहेब परदेशातून शिक्षण घेऊन मुंबईला आले असता, त्यांच्या स्वागताला सर्व आंबेडकरी समाज मुंबई बंदरात आला. रमाईला नेसण्यासाठी चांगली साडी नव्हती म्हणून छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेबांच्या सत्कारप्रसंगी दिलेला भरजरी फेटा नेसून बाबासाहेबांच्या स्वागतासाठी आल्या.ते पाहून बाबासाहेबांना ही आतून गदगदून आले.या ही प्रसंगी डॉ.बाबासाहेबांचे नाव जाऊ नये. बॅरिस्टरच्या पत्नीेला नेसण्यासाठी धड एक साडी नाही असे कोणी म्हणू नये यासाठी तिने शाहू महाराजांनी सत्कार प्रसंगी दिलेला फेटा नेसला आणि बाबासाहेबांच्या स्वागतासाठी उभी राहिली.लोकांना ते लक्षात आले ही नसेल पण बाबासाहेबांच्या नजरेतून ते चुकले नाही.त्यांनी तिला पाहून त्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली.ते बोटीतून उतरताच त्यांच्या जयजयकाराने बंदर दुमदुमून गेले. अनेकजण त्यां ना भेटत होते, हस्तांदोलन करीत होते. पण रमाई मात्र लांब कोपऱ्यात उभी होती. डॉ. बाबासाहेबांची नजर त्यांच्या रामूवर गेली. ते जवळ गेले. त्यांनी विचारले, रामू तू लांब का उभी राहीलीस? रमाई म्हाणाली, तुम्हाला भेटण्यासाठी सारा समाज आतूर झाला असताना मी तुम्हाला अगोदर भेटणे योग्य नाही. मी तर तूमची पत्नीच आहे. मी तुम्हांस कधीही भेटू शकते.येवढा समजूतदारपणा रमाईच्या अंगी होता.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्ययनात व्यत्यय येऊ नये म्हणून त्या राजगृहाच्या प्रवेशद्वारावर तासनतास बसून राहायच्या. बाबासाहेबांना कोणी भेटायला आल्यावार त्यांच्याशी तितक्याच अदबीने वागत, “साहेब पुस्तकाच्या कोंडाळ्यात आहेत, नंतर भेटा” असे म्हणत. आलेल्याची रवानगी करताना त्याचे नाव, गाव, कामाचे स्वरूप, पुन्हा कधी येणार आहात, हे सारे एका नोंदवहीत टिपण्यास सांगत.
एकदा बाबासाहेब आणि रमाई दादरच्या राजगृह बंगल्यावर राहत होते. त्यावेळी एकदा अचानक बाबासाहेबांना परदेशी काही कामा निमित्त जायचे होते पण रमाईला एकटी घरामध्ये कसे राहायला ठेवायचे म्हणून बाबासाहेब धारवाडच्या त्यांच्या वराळे मित्राकडे रमाईला पाठवले व काही दिवस तिकडेच राहायला सांगितले.ते वराळे काका धारवाड मध्ये लहान मुलांचे वसतीगृह चालवत असत. त्या वसतीगृहाच्या आवारात अनेक लहान मुले खेळायला येत असत. एकदा अचानक दोन दिवस ते लहान मुले खेळायलाच आली नाही. म्हणून रमाई वराळे काका यांना विचारते, ‘दोन दिवस झाली ही मुले कुठे गेली आहेत खेळायला आवारात का आली नाही’ त्यावेळी वराळे म्हणाले, ‘ती लहान मुले दोन दिवसा पासून उपाशी आहेत. कारण वसतीगृहाला जे अन्न धान्याचे अनुदान महिन्याला मिळायचे ते अजून मिळालेले नाही ते मिळायला अजून तीन दिवस लागतील. अजून तीन दिवस ही मुले उपाशीच राहणार आहेत’.त्यावेळी रमाई लगेच आपल्या खोली मध्ये जातात आणि रडत बसतात आणि कपाटातला सोनं ठेवलेला डबा आणि आपल्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढून वराळे यांच्याकडे देवून म्हणाल्या, ‘तुम्ही ह्या बांगड्या आणि डबा ताबडतोब विकून किंवा गहान ठेवून लहान मुलांसाठी खाण्याच्या वस्तू घेवून या. मी अजून तीन दिवस ही लहान मुले उपाशी नाही पाहू शकत’. त्यावेळी वराळे त्या बांगड्या आणि डबा घेवून जातात आणि लहान मुलांसाठी जेवणाच्या वस्तू घेवून येतात आणि लहान मुले त्यावेळी पोटभरून जेवण करतात. हे पाहून रमाई खूप आनंदी होते. तिचा आनंद गगनात मावत नव्हता. मग त्यावेळी ही सगळी लहान मुले रमाबाई यांना “रमाआई” म्हणून बोलायला लागतात. आणि त्या क्षणा पासून रमाबाई ही माता रमाई झाली. आणि ती सगळ्यांची आई झाली.नेमका हाच प्रसंग कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांच्या जीवनातील प्रसंगाशी जुळतो.त्यांनीही वस्तीगृहातील मुलांसाठी आपले सोने मोडून मुलांना जेवण दिले.त्यांना उपाशी झोपू दिले नाही.

रमाईची शरीर काबाड कष्टाने पोखरुन गेल होते.त्यात त्यांचे सततचे उपवास त्यामुळेत्या सतत आजारी पडू लागल्या. रमाईचा आजार बळावला होता. १९३५ च्या जानेवारी महिन्यापासून रमाईचा आजार वाढतच चालला होता. मे १९३५ला तर आजार खूपच विकोपाला गेला. बाबासाहेबांनी सर्व नामांकित डॉक्टरांना पाचारण केले. औषधोपचारही लागू होत नव्हता. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून बाबासाहेब आजारी रमाईच्या जवळ बसून राहू लागले. आजारी रमाई त्यांच्याकडे एकटक बघत असत. बोलण्याचा प्रयत्नब करीत असत; पण अंगात त्राण नसल्यामुळे त्या बोलू शकत नव्हत्या. त्यांना स्वतः बाबासाहेब औषध देत असत आणि कॉफी किंवा मोसंबीचा रस स्वतःच्या हाताने पाजण्याचा प्रयत्नत करीत असत.परतू म्हणावा तितका प्रतिसाद त्यांचे शरीर देत नव्हते.असताच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांवर दुःखाचा मोठा आघात झाला. दादरच्या राजगृहामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

२७ मे १९३५ रोजी सकाळी ९ वाजता रमाईची प्राण ज्योत मावळली. सर्व परिसर आकांतात बुडाला. कोट्यावधी रंजल्या गांजल्याची रमाई माता काळाच्या पडद्याआड गेली होती. दुपारी २ वाजता रमाईची प्रेतयात्रा वरळी स्मशानाकडे निघाली. पहाडासारखा महामानव,क्रांतीसूर्य डॉ.बाबासाहेब ढसाढसा रडले. जवळ जवळ तीस वर्षांच्या संसारात प्रेमाने व धैर्याने भक्कम सोबत देणार्याा रमाबाई मध्येच अचानक सोबत सोडून जाण्याने डॉ. बाबासाहेब आपल्या संसारात अगदी एकाकी झाले. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे रमाबाईंवर निस्सीम प्रेम होते. तिचे कष्ट पाहून त्यांचे मन तुटायचे. त्यांनी आपल्या रामूला पाठवलेल्या पत्रात त्यांच्या या भावना प्रतिबिंबित व्हायच्या. ‘थॉट्स ऑन पाकिस्तान’ हा आपला ग्रंथ बाबासाहेबांनी आपल्या ‘प्रिय रामू’ला अर्पण केला. अर्पणपत्रिकेत बाबासाहेबांनी लिहिले आहे की, ‘‘तिच्या हृदयाचा चांगूलपणा, मनाची कुलीनता आणि शीलाच्या पावित्र्यासह तिचे शालीन मनोधैर्य नि माझ्याबरोबर दु:ख सोसण्याची तिची तयारी अशा दिवसांत तिने मला दाखविली. जेव्हा मी नशिबाने लादलेला मित्रविरहित काळ चिंतेसह कंठीत होतो. या बिकट परिस्थितीत साथ देणाऱ्या रामूच्या आठवणींत कोरलेले हे प्रतीक.’’ आपल्या पत्नीबद्दलच्या भावना बाबासाहेबांच्या या अर्पण पत्रिकेतून व्यक्त झाल्या आहेत.
शेवटी डॉ.यशवंत मनोहर त्यांच्या त्यागाचे,कर्तृत्वाचे वर्णन करताना आपल्या रमाई या कवितेत लिहितात,

सुगंधाचे तारांगण तुझ्या मारून गेले मरणासही
तुझ्या डोळ्यातील पहाड मावत नाहीत नभात ही
तू दिलेली महाझुंज आता मावत नाही महायुद्धातही
तुझी कळकळ अशी असीम की मावत नाही कळकळीतही

गळ्यामधली गदगद तुझ्या मावत नाही दिगंतातही
तू थापलेल्या गोवऱ्या आता जळत नाहीत वणव्यातही
तू पेटवलेली चूल आता विझत नाही पावसातही
तू पेरलेल्या ज्वाला आता विझत नाहीत पुरातही
तुझे राणीपण असे अढळ की मावत नाही राजगृहातही
तुझ्या हृदयाचे झाड आता मावत नाही गगनातही
तू लावलेल्या दिव्यांचा मोर्चा विझत नाही वादळातही..!

सोमीनाथ पोपट घोरपडे,प्रकल्प अधिकारी
प्रगत शिक्षण संस्था,फलटण
इमेल : bhimai05@gmail.com
मो.नं.७३८७१४५४०७


Back to top button
Don`t copy text!