रेशीम शेतीतून आर्थिक स्वावलंबनाला चालना

उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांचे प्रतिपादन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । 15 मार्च 2025। सोलापूर । जिल्ह्यात रेशीम शेतीला पूरक हवामान आहे. तसेच हिरज येथे रेशीम बाजारपेठ निर्माण झालेली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी तुतीची लागवड करून रेशीम शेती करण्यासाठी रेशीम विभाग व सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. हे पीक कॅश क्रॉप असल्याने यातून शेतकर्‍याच्या आर्थिक स्वावलंबनाला चालना मिळेल, असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर यांनी केले.

‘एकात्मिक पर्यटन विकास प्रकल्प’ अंतर्गत नियोजन भवन, सोलापूर येथे रेशीम शेती मूल्यसाखळी विकास चर्चासत्र आयोजित करण्यात उपजिल्हाधिकारी (महसूल) तथा जिल्हा पर्यटन अधिकारी अमृत नाटेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या चर्चासत्रात जिल्ह्यातील प्रगतशील रेशीम उद्योजक, तज्ज्ञ आणि अधिकारी यांनी सहभाग घेतला. याप्रसंगी सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी श्रीमती प्रितम कुंटला, रेशीम विकास अधिकारी विनीत पवार, सिंहगड इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. एस. एच. पवार, कृषी विकासतज्ञ जितेंद्र नाईक व शिरीष तेरखेडकर, प्रमुख समन्वयक भरत काळे, उपजीविकातज्ञ प्रविण कुर्‍हे, स्थापत्य अभियंता विनायक जवळकोटे, क्षेत्र समन्वयक राहुल डफळ यांची उपस्थिती होती.

यावेळी उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी एकात्मिक पर्यटन विकास प्रकल्पाचा जिल्ह्यातील संभाव्य विकासावर दृष्टीक्षेप टाकून पर्यटन व कृषी व्यवसाय यांचे सुसंवाद साधण्याचे महत्त्व स्पष्ट केले. जिल्ह्यात रेशीम शेतीला पोषक वातावरण असल्याने शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणावर रेशीम शेती करण्यासाठी रेशीम विभाग व कृषी विभागाने प्रयत्न करावेत असेही त्यांनी सुचित केले.

सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी श्रीमती प्रितम कुंटला यांनी एकात्मिक पर्यटन विकास प्रकल्पाची उद्दिष्टे व धोरणे याबाबत सखोल माहिती दिली. रेशीम विकास अधिकारी श्री. पवार यांनी तुती लागवड, कोष निर्मिती आणि शासकीय योजनांच्या मदतीने रेशीम उद्योग विस्तार याबाबत मार्गदर्शन केले.

सिंहगड इन्स्टिट्यूटचे डॉ. एस. एच. पवार यांनी रेशीम उद्योगातील मूल्यसाखळी आणि अतिसूक्ष्म तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यावर भर दिला. कृषी विकास तज्ञ जितेंद्र नाईक यांनी रेशीम उत्पादक कंपन्यांचे महत्त्व व उद्योगातील नव्या व्यावसायिक संधींवर प्रकाश टाकला. श्री. शिरीष तेरखेडकर यांनी उद्योगवाढीसाठी उपयुक्त धोरणे आणि उपाययोजना याबद्दल चर्चा केली.

या चर्चासत्रात उपस्थित तज्ज्ञांनी रेशीम उद्योगाच्या वाढीसाठी सहकार्य आणि नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब महत्त्वाचा असल्याचे सांगितले. तसेच, जिल्ह्यातील रेशीम शेतीला गती देण्यासाठी नवीन व्यावसायिक संधी, सरकारी योजना व तांत्रिक प्रशिक्षणाच्या गरजेवर भर देण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख समन्वयक भरत काळे यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यानंतर कृषी विकास तज्ञ शिरीष तेरखेडकर यांनी बैठकीच्या उद्दिष्टांवर प्रकाश टाकला.

भरत काळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी मोहोळ, माळशिरस आणि पंढरपूर तालुक्यातील 30 प्रगतशील रेशीम उद्योजक या चर्चासत्रात सहभागी झाले होते.


Back to top button
Don`t copy text!