साताऱ्यात मेघगर्जनेसह गारांचा पाऊस; उकाड्यापासून दिलासा, पण शेतकरी चिंतेत


सातारा शहर आणि परिसरात सोमवारी सायंकाळी मेघगर्जनेसह गारांचा अवकाळी पाऊस झाला. यामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी, पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

 स्थैर्य, सातारा, दि. ३० मार्च : सातारा शहर आणि परिसरात सोमवारी सायंकाळी अचानक मेघगर्जनेसह आणि गारांच्या पावसाने हजेरी लावली. गेल्या दोन दिवसांपासून आकाशात काळ्या ढगांची दाटी आणि वाढलेल्या भयंकर तापमानामुळे हैराण झालेल्या सातारकरांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला असून हवेत गारवा निर्माण झाला आहे.

गारांचा तडाखा आणि विजेचा लपंडाव

सायंकाळी साडेसहाच्या सुमारास थंडगार वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीला जोर कमी असला तरी नंतर पावसाने जोर धरला. शहरातील शाहूनगर आणि गोडोली नाका परिसरात गारांचा मोठा तडाखा बसला. याच वेळी विजेचा लपंडाव सुरू असल्याने नागरिकांना अंधारातच पावसाचा सामना करावा लागला. कामावरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना अचानक आलेल्या पावसामुळे आडोसा शोधावा लागला.

रब्बी पिकांना आणि कैऱ्यांना फटका

या अवकाळी पावसामुळे शहरात थंडावा निर्माण झाला असला तरी, शेतीचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. सध्या काढणीला आलेल्या गहू आणि भुईमूग पिकांना या पावसाचा मोठा फटका बसला आहे. तसेच, झाडावर लागलेल्या कैऱ्यांचेही गारांमुळे नुकसान झाल्याने शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.


Back to top button
Don`t copy text!