
दैनिक स्थैर्य । 8 जून 2025। सातारा ।मराठा साम्राज्याची राजधानी असणार्या व ऐतिहासिक सातारा नगरीला 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा मान मिळण्याची दाट शक्यता आहे. स्थळ निवड समितीने शनिवारी सातार्यात भेट देऊन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची सुरुची निवासस्थानी भेट घेतली. यासाठी मराठी साहित्य परिषद शाहूपुरी शाखेने तब्बल एक तपाचा पाठपुरावा केला आहे.
साहित्य महामंडळ पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे नुकतेच आले आहे. साहित्य परिषदेच्या कार्यवाहक सुनीताराजे पवार आणि महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी मूळचे सातार्याचेच असल्याने संमेलनासाठी त्यांचा खास आग्रह आहे. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या मनातही सातार्याबद्दल विशेष स्नेह आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद शाहपुरी शाखेच्या यांचेवतीने दरवर्षी सातार्यात मराठी भाषा पंधरवड्याच्या निमित्ताने विविध कार्यक्रम होत असतात. मराठी साहित्य संमेलनाच्या मागणीसाठी गेली बारा वर्षे विनोद कुलकर्णी यांचा पाठपुरावा सुरू आहे. शाहपुरी शाखेने सातार्यासाठी साहित्य संमेलनाची मागणी केली आहे. याशिवाय मसाप इचलकरंजी शाखा, सदानंद साहित्य मंडळ औदुंबर, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूर येथूनही निमंत्रणे आल्याने साहित्य संमेलनाच्या स्थळ निवड समितीने या ठिकाणांना भेटी दिल्या. प्रा. मिलिंद जोशी आणि त्यांच्या सहकार्यांनी शनिवारी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेतली.
स्थळाची घोषणा आज होणार…
कै. अभयसिंहराजे भोसले यांच्या विशेष प्रयत्नाने 1993 मध्ये सातारा येथे 66 वया अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा मान मिळाला होता. त्यानंतर 2003 मध्ये कराड व 2009 मध्ये महाबळेश्वर येथे मराठी साहित्य झाले होते. आता सोळा वर्षानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या यजमानपदाचा मान सातार्यासाठी जुळून आला आहे. सातार्याला संमेलनाचा मान मिळाल्यास मसाप शाहूपुरी शाखेबरोबरच संयोजन समितीचे सर्व सदस्य तन मन धन अर्पून या कामासाठी मनापासून झटतील, अशी ग्वाही शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी समितीच्या सदस्यांना दिली. प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, ’स्थळ निवड समितीने कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी इथे भेटी दिल्या आहेत. सर्व ठिकाणची व्यवस्था तुल्यबळ आहे. त्यामुळे स्थळ निवड समितीच्या अहवालाच्या आधारे अंतिम निर्णय पुण्यामध्ये रविवारी जाहीर केला जाईल. त्यामुळे रविवारी सातार्याच्या नावाची घोषणा झाल्यास सातार्यात निश्चित दिवाळी साजरी होणार आहे.