साताऱ्यात उन्हाचा तीव्र तडाखा; नागरिक हैराण, शीतपेयांना मोठी मागणी


सातारा शहर आणि परिसरात तापमानाचा पारा वाढल्याने नागरिकांना उन्हाचा तीव्र चटका बसत आहे. उकाड्याने हैराण झालेल्या सातारकरांकडून शीतपेयांची मागणी वाढली आहे.

स्थैर्य, सातारा, दि. २७ मार्च : सातारा शहर आणि परिसरात सध्या उन्हाचा तीव्र तडाखा जाणवत आहे. वाढत्या तापमानामुळे अंगाची लाहीलाही होत असून, वाढत्या उकाड्याने नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत. कडक उन्हामुळे दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झाला आहे.

दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट

सूर्यनारायणाने आग ओकण्यास सुरुवात केल्याने दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. उन्हाचा चटका वाढल्यामुळे मुख्य रस्त्यांवर आणि बाजारपेठेत दुपारच्या सत्रात शुकशुकाट पाहायला मिळत आहे. अत्यंत महत्त्वाची कामे असल्यासच नागरिक घराबाहेर पडणे पसंत करत आहेत.

शीतपेयांच्या मागणीत मोठी वाढ

उन्हाच्या कडाक्यापासून बचाव करण्यासाठी नागरिकांची पावले आता शीतपेयांच्या दुकानाकडे वळत आहेत. शहरातील उसाचा रस, ताक, लस्सी, लिंबू सरबत, कलिंगड आणि आईस्क्रीमच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे रसवंती गृहे आणि शीतपेयांच्या दुकानांवर नागरिकांची गर्दी दिसून येत आहे.


Back to top button
Don`t copy text!