फलटण शहरात उद्यापासून ३० टक्के पाणीकपात लागू; नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन


स्थैर्य, फलटण, दि. २३ सप्टेंबर : पाटबंधारे विभागामार्फत सोमवार पेठ येथील नीरा उजवा कालव्याच्या अस्तरीकरणाचे काम हाती घेण्यात आल्याने, फलटण शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. नगरपरिषदेच्या साठवण तलावातील पाण्याची पातळी कमी होत असल्याने, उद्या, बुधवार दि. २४ सप्टेंबरपासून संपूर्ण शहरामध्ये ३० टक्के पाणीकपात लागू करण्यात येत असल्याची माहिती मुख्याधिकारी तथा प्रशासक निखिल जाधव यांनी एका जाहीर सूचनेद्वारे दिली आहे.

पाटबंधारे विभागाने कालव्याच्या दुरुस्ती कामासाठी दि. ११ सप्टेंबरपासून नीरा उजवा कालवा वीर धरणाजवळ बंद केला आहे. शहराला पाणीपुरवठा करणारा हा मुख्य स्त्रोत सुमारे ३० ते ३५ दिवस बंद राहणार आहे. सद्यस्थितीत नगरपरिषदेच्या सुधारीत जलकेंद्रातील साठवण तलावातून शहराला पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, हा साठा वेगाने कमी होत असल्याने पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला आहे.

या कालावधीत नागरिकांनी दैनंदिन वापरासाठी पुरेसा पाणीसाठा करून ठेवावा, तसेच उपलब्ध पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा आणि नगरपरिषद प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!