‘पक्ष सोडताना कुणाला तरी व्हिलन ठरवावं लागतं, त्यांनी मला ठरवलं, पण कुणाच्या जाण्याने पक्ष थांबत नाही’- देवेंद्र फडणवीस

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य, दि.२१: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी करत आहेत. यादरम्यान औरंगाबादमध्ये पत्रकारांशी संवाद साधत असताना देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसेंवर पलटवार केला. ‘फडणवीस यांच्यामुळेच मला पक्ष सोडावा लागत आहे,’ असा आरोप करून भाजपमधून बाहेर पडलेल्या एकनाथ खडसेंबाबत फडणवीस म्हणाले की, पक्ष सोडताना कुणाला तरी व्हिलन ठरवावं लागतं. त्यांनी मला व्हिलन ठरवलं. योग्य वेळ आल्यावर बोलेल.

यावेळी फडणवीस म्हणाले की, नाथाभाऊंनी राजीनामा दिला हे दुर्देव आहे. त्यांनी राजीनामा दिला नसता तर चांगले झाले असते. माझ्याबद्दल त्यांना काही तक्रारी होत्या तर त्यांनी त्या वरिष्ठांना सांगायला हव्या होत्या. खडसे आता अर्धसत्य सांगत आहेत, मला त्यावर बोलायचे नाही. अशा परिस्थितीत कुणाला तरी व्हिलन ठरवायचे असते, त्यांनी मला ठरवले. पण, योग्य वेळ आल्यावर या सर्वांवर नक्की बोलेल, असे फडणवीस म्हणाले.

पक्षातील एखादा कार्यकर्ता असो किंवा मोठा नेता असो, पक्षातून गेल्यावर त्याची निश्चितच झळ पोहोचते. पण भाजप हा मोठा पक्ष आहे. कुणाच्या जाण्याने तो थांबत नाही. जळगाव जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला आहे. जनता भाजपसोबतच आहे, असेही फडणवीस यावेळी म्हणाले. पुढे खडसेंच्या रुपाने पक्षांतराची सुरुवात झाली आहे का? या प्रश्नावर फडणवीस म्हणाले की, एकही आमदार भाजपमधून जाणार नाही. सर्व आमदार भाजपसोबतच आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!