![](https://i0.wp.com/sthairya.com/wp-content/uploads/2023/02/Ramraje-Naik-Nimbalkar-jpg.webp?resize=630%2C470&ssl=1)
दैनिक स्थैर्य | दि. १९ मे २०२३ | सातारा |
नेतृत्व, लोकशाही, प्रशासन आणि शांतताप्रिय समाज निर्माण करण्यासाठी भारताच्या इतिहासामध्ये प्रथमच देशातील ४३०० आमदार राष्ट्रीय विधायक संमेलनामध्ये एकत्रित येऊन एकाच व्यासपीठावर विचारविनिमय करणार आहेत. पुणे येथील एमआयटी स्कूल ऑफ गर्व्हमेंटतर्फे आयोजित ‘राष्ट्रीय विधायक संमेलन भारत’ हे मुंबई येथील बीकेसी जीओ सेंटर मध्ये दि. १५ जून ते १७ जून २०२३ या दरम्यान होत आहे, अशी माहिती विधान परिषदेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व एमआयटी माध्यम समन्वयक योगेश पाटील यांनी दिली. कोल्हापूर समन्वयक रवी पाटील, माई साळुंखे, आरती जाधव यावेळी उपस्थित होते.
श्रीमंत रामराजे पुढे म्हणाले, राज्यातील सर्व पक्षातील आमदारांनी या संमेलनात सहभागी होऊन आपल्या लोकशाहीला अधिक सशक्त करण्यात योगदान द्यावे. राष्ट्रनिर्माण, राष्ट्रीय एकात्मिकता व राष्ट्रीय सर्वांगीण शाश्वत विकास, या मध्यवर्ती विचार त्रिसूत्रीचा प्रमुख उद्देश ठेवून आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनाचा उद्घाटन सोहळा १६ जून रोजी होणार आहे. १७ जून रोजी या संमेलनाचा समारोप होईल. या व्यतिरिक्त ४० समांतर सत्र आणि गोलमेज परिषद होणार आहे. भारताच्या लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन, डॉ. मीरा कुमार, श्री. शिवराज पाटील चाकुरकर, श्री. मनोहर जोशी तसेच लोकसभेचे सभापती ओम बिर्ला हे या संमेलनाचे मार्गदर्शक व संयोजक आहेत. एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे संस्थापक अध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांच्या विचार चिंतनामधून ‘राष्ट्रीय विधायक संमेलन, भारत’ ही संकल्पना साकारली आहे. ते या संमेलनाचे प्रमुख संयोजक समन्वयक आहेत.
या संमेलनात सार्वजनिक जीवनातील तणाव व्यवस्थापन, शाश्वत विकासाची साधने आणि प्रभाव, कल्याणकारी योजना : शेवटच्या व्यक्तीचे उत्थान, आर्थिक कल्याणासाठी तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि कौतुकास्पद विधानपद्धती या विषयांवर चर्चा होणार आहे. कार्य, जीवन संतुलन, यशाची गुरुकिल्ली, आपला मतदार संघ विकसित करण्याची कला आणि कौशल्य, आपली प्रतिमा तयार करा, साधने आणि तंत्रे, विधिमंडळ कार्यप्रदर्शन, अपेक्षेनुसार जगणे आणि सामाजिक कल्याणासाठी सहयोग, नोकरशहा आणि आमदार या विषयांवर चर्चा होणार आहे.
गोलमेज परिषदेत भारत २०४७ आमचे लक्ष सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांची चर्चा, राजकारणाचे अध्यात्मिकीकरण, अध्यात्मिक नेत्यांची चर्चा, अमृत कालमध्ये भारताचे परिवर्तन, व्यवसाय व उद्योग क्षेत्रातील लिडर्सची चर्चा, विधिमंडळाचे कामकाज : आव्हाने आणि पुढील मार्ग, सर्व राज्य विधानमंडळांच्या सचिवांची चर्चा, भारत २०४७ : आमचे लक्ष, सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांची चर्चा, माध्यम २०४७ : भूमिका आणि जबाबदार्या संपादक आणि ज्येष्ठ पत्रकारांची चर्चा, कायदा आणि नागरिक २०४७ : आमचे लक्ष : कायदेशीर तज्ज्ञांची चर्चा होणार आहे.
वरील विषयांवरील प्रत्येक सत्रांमध्ये ५० आमदार चर्चा करणार आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक सत्राचे अध्यक्षपद विधान सभेचे सभापती, विधान परिषदेचे अध्यक्ष, संसदीय कार्यमंत्री आणि पक्षनेता हे भूषविणार आहेत. राष्ट्रीय विधायक संमेलनात आतापर्यंत भारतातील सर्व राज्यातील एकूण १८०० आमदारांनी आपली उपस्थिती दर्शविली आहे. तसेच एकूण २५०० आमदार येण्याची अपेक्षा आहे.