माढ्याच्या विकासासाठी रणजितदादा व जया भाऊ थेट पंतप्रधानांच्या दारी; मोदींकडून प्रलंबित कामांना गती देण्याचे आश्वासन

फलटण-पंढरपूर रेल्वे, म्हसवड-नाईकबोमवाडी MIDC आणि खटावजवळ एअरस्ट्रीप उभारणीच्या कामांना मंजुरी देण्याची मागणी


स्थैर्य, फलटण, दि. २१ ऑगस्ट : माढा लोकसभा मतदारसंघातील महत्त्वपूर्ण आणि प्रलंबित विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. या बैठकीत मतदारसंघातील प्रमुख विकास कामांवर सविस्तर चर्चा झाली असता, पंतप्रधानांनी या कामांना तातडीने गती देण्याचे आश्वासन दिले. यावेळी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे देखील उपस्थित होते.

रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या काही प्रमुख मागण्यांचे निवेदन पंतप्रधान मोदी यांना सादर केले. यामध्ये खालील प्रमुख प्रकल्पांचा समावेश होता:

  • औद्योगिक विकास: नाईकबोमवाडी आणि म्हसवड येथील MIDC ला ‘ग्रीन इंडस्ट्रियल कॉरिडॉर’चा दर्जा देण्यात यावा.
  • हवाई वाहतूक: फलटण तालुक्याला लागून जाणाऱ्या नव्या मुंबई-बंगळूर महामार्गाजवळ, खटाव तालुक्यात एअरस्ट्रीपची (हवाई पट्टी) उभारणी करण्यात यावी.
  • रेल्वे मार्ग: फलटण-पंढरपूर या बहुप्रतिक्षित रेल्वे मार्गासाठी भरीव निधी उपलब्ध करून देऊन हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे.

या सर्व मागण्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. मतदारसंघाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या या सर्व प्रकल्पांना गती देण्यासाठी योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. या सकारात्मक प्रतिसादाबद्दल माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी पंतप्रधान मोदी यांचे माढा लोकसभा मतदारसंघातील जनतेच्या वतीने मनःपूर्वक आभार मानले.


Back to top button
Don`t copy text!