
स्थैर्य, फलटण, दि. 14 सप्टेंबर: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त, येत्या १७ सप्टेंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रात ‘नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान’ राबविले जाणार आहे. महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी, २ ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या अभियानातून राज्यातील दहा लाखांहून अधिक नागरिकांची मोफत नेत्र तपासणी, शस्त्रक्रिया आणि औषधोपचार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
या विशेष मोहिमेअंतर्गत मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर रुग्णांना मोफत चष्मेवाटप केले जाणार आहे. यासोबतच काचबिंदूसह इतर नेत्रविकारांवर निदान, सल्ला आणि उपचार देखील पूर्णपणे मोफत दिले जाणार आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यात, विशेषतः गाव, वस्ती, तांडे आणि दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर विशेष शिबिरे आयोजित केली जाणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या अभियानात राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, महानगरपालिका, इंडियन मेडिकल असोसिएशन, विविध धर्मादाय रुग्णालये आणि सामाजिक संस्थांचा व्यापक सहभाग असणार आहे.
नेत्ररोग उपचाराचा खर्च अनेकदा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असतो. त्यामुळे ही मोहीम गरजू आणि वंचित घटकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. या शिबिरांचा राज्यातील सर्व गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे.

