
दैनिक स्थैर्य । 15 जुलै 2025 । फलटण । आळंदी ते पंढरपूर या पालखी महामार्गावरील सर्व उड्डाणपूलांना महाराष्ट्रातील साधुसंतांची नावे देण्यात यावी. यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा अशी मागणी मनसेचे उपजिल्हाध्यक्ष युवराज शिंदे यांनी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख डॉ. भावार्थ देखणे व विश्वस्त चैतन्य महाराज कबीर बाबा यांना समक्ष भेटून दिले.
युवराज शिंदे यांनी म्हटले आहे की, आळंदी ते पंढरपूर या पालखी महामार्गावर केंद्रीय रस्ते विकास महामंडळ यांनी अनेक उड्डाणपूल बांधले आहेत या सर्व उड्डाणपूलांना महाराष्ट्रातील विविध साधुसंतांची नावे देण्यात यावी. महाराष्ट्र हा शेकडो वर्षापासून साधू संतांचा प्रदेश म्हणून जगात ओळखला जात आहे. या सर्व साधुसंतांनी घालून दिलेल्या आदर्श व शिकवणीवरच महाराष्ट्राची आतापर्यंतची वाटचाल चालू आहे.
या पालखी सोहळ्यामध्ये अनेक जाती धर्माचे भाविक भक्तिभावाने सामील होत आळंदी ते पंढरपूर पायी वारी करत असतात. या मार्गावरील सर्व रस्त्यांची व उड्डाणपूलांची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. याबाबतीत आपल्या स्तरावर शासनाकडे पाठपुरावा करून मार्गावरील सर्व उड्डाणपूलांना साधुसंतांची नावे देण्यात बाबत शासनाकडे आपण आग्रह धरावा, अशी मागणी श्री. शिंदे यांनी केली.
पालखी सोहळ्याचे प्रमुख डॉ. भावार्थ देखणे व विश्वस्त चैतन्य महाराज कबीर बाबा म्हणाले, आळंदी येथे यासंदर्भात सर्वांशी चर्चा करून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी पत्रव्यवहार करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.