स्थैर्य, दि.३: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी आरेमधील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र राज्य सरकारने निवडलेल्या कारशेडच्या जागेवरून आता वाद पेटला आहे. कारण मेट्रो कारशेडची कांजूरमार्गची जागा ही केंद्राची असल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. याबाबत केंद्राने याबाबत राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिले आहे.
“कांजूरमार्गची जागा मिठागराची आहे. MMRDA ला जागा हस्तंतारिकत करण्याचा आदेश रद्द करा. आम्ही त्यावरील आमचा हक्क सोडलेला नाही,” असे केंद्राने या पत्रात नमूद केले आहे. “यापूर्वीही MMRDA चा प्रस्ताव आम्ही फेटाळला होता. त्यामुळे आमच्या परस्पर कारशेड उभारणे चुकीचे आहे. त्यामुळे MMRDA ने या कारशेडचे काम त्वरित थांबवावे, असेही केंद्राने या पत्रात म्हटले आहे. केंद्राच्या या पत्रानंतर राज्य सरकार यावर काय उत्तर देते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आरे कारशेड कांजूरमार्गला, मुख्यमंत्र्यांचा निर्णय
फडणवीस सरकारच्या काळात आरे परिसरात मेट्रो कारशेड उभारण्यात येणार होते. मात्र 11 ऑक्टोबरला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मेट्रो प्रकल्पाची कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेतला. कांजूर येथील कारशेडसाठी मेट्रोला राज्य सरकारकडून मोफत जमीन दिली जाणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते.