प्राचार्य विश्वासराव देशमुख शतायुषी व्हा !


रविवार दि.15 जून 2025 रोजी प्राचार्य विश्वासराव देशमुख 86 वर्षे मागे टाकून 87 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. श्रीमंत मालोजीराजे,श्रीमंत शिवाजीराजे यांच्या परिस स्पर्शाने त्यांच्या आयुष्याचे सोने झाले. मुधोजी महाविद्यालयाचा पहिला विद्यार्थी त्याच महाविद्यालयात एक विद्यार्थी प्रिय प्राध्यापक होतो, त्यानंतर 12 वर्षे त्याच महाविद्यालयात प्राचार्य होतो व त्यांच्या प्राचार्य पदाची कामगिरी महाविद्यालयाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावी अशी होते.

ही कामगिरी लक्षात घेऊन श्रीमंत रामराजे,श्रीमंत रघुनाथराजे व श्रीमंत संजीवराजे त्यांना फलटण एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षपदी संधी देतात व त्या संधीचेही ते सोने करतात. राजघराण्याचा तीन पिढ्यांचा विश्वास त्यांनी संपादन केला. गेली साठ वर्षे ते राजघराण्यात घरच्यासारखे वावरतात व आपल्या घरातीलच एक सदस्य म्हणून राजघराण्यातील सर्व लोक त्यांच्याकडे पाहतात ही त्यांची सर्वात मोठी कमाई आहे.

मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य झाल्यावर देशमुख सरांना आपली कर्तबगारी दाखविण्याची संधी मिळाली. कॉपीचे प्रमाण वाढल्यामुळे विद्यापीठाने मुधोजी महाविद्यालयाचे सेंटर बंद केले होते. संस्थेचे सचिव श्रीमंत शिवाजीराजे होते. त्यांना बरोबर घेऊन विद्यापीठात हेलपाटे घालून गेलेले सेंटर परत मिळविले व ते अत्यंत चांगल्या पद्धतीने चालविले. प्राध्यापकांचे आर्थिक सहकार्य घेऊन महाविद्यालयाच्या तिसर्‍या मजल्याचे काम पूर्ण केले.

खेळाला प्रोत्साहन मिळावे म्हणून 400 मिटर रनिंग ट्रॅक श्रीमंत संजीवराजे यांच्या सहकार्याने तयार केला. देशमुख सरांच्या काळात राष्ट्रीय सेवा योजना विभागाला इंदिरा गांधी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला. एकूणच प्राचार्य विश्वासराव देशमुख यांच्या कार्यकाळात मुधोजी महाविद्यालयाने सर्व आघाड्यावर नेत्रदिपक प्रगती केली.

देशमुख सरांचे हे कार्य लक्षात घेऊन त्यांच्या सेवानिवृत्तीच्या समारंभात श्रीमंत रामराजे म्हणाले,“तडफदार व्यक्तिमत्त्व, उत्तम प्रशासक,समन्वयकार, संत साहित्याचे अभ्यासक, प्रभावी संघटक, शिस्तप्रिय,अजातशत्रू, लेखक, उत्तम वक्ते अशी अनेक वैशिष्ट्ये विश्वासराव यांची सांगता येतील. त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेले कार्य निःसंशय श्रेष्ठ असून, त्यांचे जीवन एक आदर्श व ध्येयवेड्या प्राचार्यांचे उत्तुंग यश आहे.” याच कार्यक्रमात श्रीमंत संजीवराजे आपल्या भाषणात म्हणाले,”देशमुख सरांची प्राचार्य पदाची कामगिरी मुधोजी महाविद्यालयाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावी अशीच आहे. कोणतेही यश हे सुखासुखी मिळत नसते. त्यासाठी स्वतःला झोकून द्यावे लागते व कोणत्याही कामात झोकून देण्याची सरांची सवयच त्यांना यशाच्या शिखराकडे घेऊन जाते.

एखादे महाविद्यालय चालविणे म्हणजे एखादा कारखाना चालविणे असा अनेकांचा गैरसमज असतो. एकवेळ कारखाना चालविणे सोपे पण प्राचार्य होऊन कॉलेज चालविणे ही फार मोठी तारेवरची कसरत असते. विद्यार्थी, पालक, प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी, संस्थाचालक, शासन व विद्यापीठ यांचे एकाचवेळी समाधान करण्याचे अवघड काम प्राचार्यांना पार पाडावे लागते. हे अवघड काम देशमुख सरांनी आपल्या अंगभूत कौशल्याने लिलया पार पाडले आहे.

प्राचार्य विश्वासराव देशमुख यांची साहित्य क्षेत्रातही उत्तम कामगिरी आहे. निवृत्त झाल्यावर त्यांनी आपला लेखन प्रवास सुरू केला व प्रथम दै.ऐक्यच्या झुंबर पुरवणीत संत साहित्यावर पंचवीस लेख सलगपणे लिहिले व वाचकांनी त्यांचे कौतुक केले. त्यानंतर त्यांनी ‘मालोजीराजे’ ग्रंथ लिहिला व त्याला डॉ.जयसिंगराव पवार यांनी प्रस्तावना लिहिली व ग्रंथाचे कौतुकही केले. त्यानंतर ‘शिवाजीराजे’,’आधुनिक भगीरथ’,‘श्रीमंत लक्ष्मीदेवी राणीसाहेब’ हे ग्रंथ त्यांनी लिहिले. त्यांच्या या लेखन प्रकाराचे कौतुक करताना प्राचार्य शिवाजीराव भोसले म्हणतात,“फलटणच्या इतिहास प्रसिद्ध नाईक निंबाळकर घराण्याचे प्रमाणभूत चरित्रकार असा प्राचार्य विश्वासराव देशमुख यांचा लौकिक आहे.”

दि.30 जून 1999 ला देशमुख सर सेवानिवृत्त झाले. निवृत्तीनंतर त्यांनी श्रीमंत मालोजीराजे स्मृति प्रतिष्ठानला वाहून घेतले व प्रतिष्ठानद्वारे फलटण तालुक्यात एक नवी सांस्कृतिक चळवळ उभी केली. संस्थान काळात श्रीमंत मालोजीराजे महाराष्ट्रातील व देशातील विद्वान लोकांना, कलावंतांना, साहित्यिकांना फलटण संस्थानमध्ये निमंत्रण देऊन त्यांचा यथोचित गौरव करीत असत तीच परंपरा आज देशमुख सरांनी सुरू ठेवली आहे. मालोजीराजे स्मृति प्रतिष्ठानच्या माध्यामातून दरवर्षी मालोजीराजे यांच्या पुण्यतिथीला म्हणजे 14 मे रोजी मालोजीराजे स्मृति पुरस्कार दिला जातो. कोणत्याही क्षेत्रात अलौकिक कामगिरी करणाराला हा मानाचा पुरस्कार देऊन त्याचा गौरव केला जातो. नुकतेच देहावसान झालेले थोर शास्त्रज्ञ डॉ.जयंत नारळीकर यांना हा पुरस्कार दिला होता. त्याचप्रमाणे डॉ.विजय भटकर, डॉ.अनिल काकोडकर या शास्त्रज्ञांना त्यांच्या कामगिरीबद्दल हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे.

त्याचप्रमाणे सिंधूताई सपकाळ, डॉ.प्रकाश आमटे, डॉ.तात्याराव लहाने यांच्या समाजकार्याबद्दल त्यांचाही हा पुरस्कार देऊन गौरव केला आहे. दि.14 मे ते 25 मे श्रीमंत मालोजीराजे व श्रीमंत शिवाजीराजे स्मृति महोत्सव गेली पंचवीस वर्षे सलग बारा दिवस साजर केला जातो व त्यात नामवंत वक्ते,गायक,लहान मुलांसाठी कार्यक्रम ठेवले जातात. ज्यांना बोलता येते त्यांना लिहिता येतेच असे नाही व ज्यांना लिहिता येते त्यांना बोलता येतेच असे नाही. परंतु ज्यांना लिहिता येते व बोलताही येते त्यांना तोड नसते. प्राचार्य शिवाजीराव भोसले यांना ते जमले व त्यांच्यानंतर ते प्राचार्य देशमुख सरांनाच जमले आहे त्यामुळे खर्‍या अर्थाने ते प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचे उत्तराधिकारी ठरले आहेत. देशमुख सर सेवानिवृत्त झाल्यावर त्यांना भेटण्यासाठी प्राचार्य शिवाजीराव भोसले त्यांच्या घरी गेले व म्हणाले,“माझा आवडता विद्यार्थी व समर्थ उत्तराधिकारी आता निवृत्त झाल्यावर कसा दिसतो आहे हे पाहण्यासाठी मी आलो आहे.”

प्राचार्य विश्वासराव देशमुख सरांनी वयाची 86 वर्षे मागे टाकली आहेत व फक्त 14 वर्षे राहिली आहेत. त्यांचा उत्साह,त्यांचे सततचे काम,त्यांचा नियमितपणा व व्यायाम या गोष्टी लक्षात घेता ही चौदा वर्षे फार वाटत नाहीत. त्यांनी आपल्या जगण्याला उदात्ततेची जोड दिली आहे. त्यांनी आपले जीवन जाणीवपूर्वक प्रवाही ठेवले आहे. कायम वर्तमानात जगण्याचा ते प्रयत्न करतात म्हणून ते कायम आनंदी दिसतात. जीवनाकडे विनोदी दृष्टीने ते पाहतात व म्हणून त्यांचे जीवनही सुखावह होते. हास्यविनोद हा सर्वात मोठा मानवधर्म आहे.

या धर्माचे पालन करणारे सुखी व दिर्घायुषी होतात. देशमुख सरांनी या वयातही आपली विनोदबुध्दी जागृत ठेवली आहे. आजही त्यांना भेटावयास गेलेला माणूस त्यांच्याकडून काहीतरी चांगला विचार घेऊन जातो. त्यांच्याशी गप्पा मारताना अतिशय आनंद होतो व किती वेळ गेला याचे भान रहात नाही. प्राचार्य विश्वासराव देशमुख यांना दीघायुष्य लाभावे व ते शतायुषी व्हावेत अशी परमेश्वराला प्रार्थना करतो व पूर्णविराम देतो.

– उमेश सिताराम निंबाळकर,

सन ग्राफिक्स, फलटण


Back to top button
Don`t copy text!