पावसाळ्यातील साथ रोग नियंत्रणासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. २८ जून २०२३ । सातारा । सध्या पावसाळा सुरु झाला असून, जिल्हयातील व दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रानां मोठया प्रमाणात औषधसाठ्याचा पुरवठा करण्यात आला  आहे. सर्व कर्मचाऱ्यांनी अतिवृष्टीच्या काळात त्यांची नेमणूक असलेल्या ठिकाणी राहून आरोग्य सेवा पुरवावी अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी दिल्या आहेत.

पावसाळ्यात जलजन्य, किटकजन्य इ. पासून साथ परसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या करिता आरोग्य विभागाने सातारा जिल्हयातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत कार्यरत सर्व उपकेंद्राकडील आरोग्य कर्मचारी यांचा पावसाळा पूर्व नियोजना बाबत आढावा घेतला. पावसाळ्यातील साथ रोग नियंत्रणासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ प्रमोद शिर्के यांनी यावेळी दिली.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमिवर सर्व भागातील पाणी पुरवठा योजनांचे सर्व्हेक्षण करुन, जर एखाद्या ठिकाणी गळती किंवा व्हॉल्व गळती असल्यास, त्या बाबत संबंधीत ग्रामपंचायतीस लेखी पत्र देऊन त्या बंद करणे बाबतची कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच डेग्यु, चिकनगुनिया बाबतचे सर्व्हेक्षण करण्यात आले असून डास उत्पत्ती स्थाने नष्ट करण्यात आली आहेत. आरोग्य विभाग व ग्राम पंचायत विभाग यांच्या सयुक्त विद्यमाने हिवताप जनजागरण पंधरवडा राबविण्यात येत आहे. या बाबतच्या प्रत्येक तालुक्यातील आरोग्य कर्मचारी यांच्या तालुकास्तरीय आढावा सभा घेण्यात आल्या असून पावसाळयात करावयाच्या कामकाजा बाबतच्या सूचना देणत आल्या आहेत.

पावसाळ्यातील कामकाजाबाबत पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्यात येत आहे. सर्व्हेक्षणामध्ये गावातील सर्व विहीर, टाकी, प्रत्येक पेठेतील पहिले व शेवटचे घर, गटारातून गेलेले नळ या ठिकाणी ओटी टेस्ट घेणेत येत आहे. सर्व पाणी उद्भवाचे पाणी नमुने तपासणीस घेतले जात आहेत. संपूर्ण गावात प्रत्यक्ष फिरुन मुख्य पाईपलईन, खाजगी नळ कनेक्शन यामध्ये असणारी गळती शोधून काढणे व ती सर्व संबंधीत ग्राम पंचायती मार्फत तात्काळ दुरुस्ती करुन घेणे. सर्व्हेक्षणाचे वेळी ग्राम पंचायतीमार्फत गटारे वाहती करावीत. पिण्याच्या पाण्याच्या टाकीचा व विहीरीचा परिसर स्वच्छ करावा. ग्रामपंचायतीकडे असणारे पाणी शुध्दीकरणासाठी लागणारे टि सी एल साठवणूक योग्य आहे का याची पाहणी करुन योग्य ती उपाययाजना करावी.

जिल्हयातील अतिवृष्टी होणाऱ्या जावली, महाबळेश्वर, पाटण व वाई या तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रानां अतिआवश्यक असणारी औषधे श्वानदंश – 3 हजार 103, सर्पदंश – 518, जुलाबा करताच्या गोळया पऱ्यायुराझीडॉल – 3 लाख 25 हजार 413, मेट्रोनिडाझोल – 94 हजार 291, ओ आर एस – 20 हाजर 106, पॅरासिटामोल – 4 लाख 97 हजार 377 व सोडीयम हॉयपोक्लोराईड – 3 हजार 15 जादाची औषधे पुरविण्यात आली आहेत. या बरोबर संबंधीत तालुक्यातील दुर्गम भागातील अपेक्षीत प्रसुती होणाऱ्या गरोदर माता यांना संरक्षीत ठिकाणी प्रसुती करिता घेऊन जाणे इ करिता सर्व ॲम्बूलन्स सुस्थितीत ठेवण्यात आले आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर दुर्गम भागात किरकोळ आजारा करिता औषधे उपलब्ध होण्यासाठी  भागातील आशांना औषधसाठा देण्यात आला आहे.

पावसाळया करिता जिल्हयातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, तालुकास्तर व जिल्हास्तरावर साथरोग नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. त्यामध्ये सर्व ठिकाणी 24 तास संबंधीत संस्था कार्यरत आहेत. एखादया ठिकाणी आरोग्याशी संबंधीत किंवा आकस्मित घटना घडली तर त्यासाठी साथरोग नियंत्रण कक्षाशी संपर्क क्र 02162-233025 त्वरीत संपर्क साधवा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी श्री शिर्के यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!