‘महावीर जयंती उत्सव’ साजरा करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी


स्थैर्य, मुंबई, दि.२०: संपूर्ण राज्यात महावीर जयंती उत्सव जैन बांधवांमार्फत मोठ्या प्रमाणात व उत्साहाने साजरा केला जातो. राज्यात सुरु असलेला कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता यंदा 25 एप्रिल रोजी महावीर उत्सव साजरा करण्यात येणार आहे. राज्यात कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत आहे. त्या दृष्टीकोनातून महसूल व वन तसेच आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग यांच्या 13 एप्रिल च्या आदेशांमधील तरतुदींच्या अधिन राहून या वर्षी महावीर जयंती उत्सव साजरा करणे आवश्यक आहे. कोरोना संकटामुळे यावर्षी सर्व धर्मीय सण, उत्सव तसेच सर्व कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत.

त्याअनुषंगाने गृहविभागामार्फत खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत.

महावीर जयंती उत्सव लोक मोठ्या प्रमाणात एकत्रित येऊन साजरी करतात. परंतू यावर्षी लोकांनी एकत्र न येता साधेपणाने आपआपल्या घरी महावीर जयंती उत्सव साजरा करणे अपेक्षित आहे.

कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली असल्याने मंदिरात पूजा अर्चा व दर्शनासाठी जाता येणार नाही.

मंदिरामधील व्यवस्थापक/विश्वस्त यांनी शक्य असल्यास दर्शनाची ऑनलाईन सुविधा, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादी द्वारे उपलब्ध करुन द्यावी.

महावीर जयंती उत्सवानिमित्त कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत.

कोविड- 19 च्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेच प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत काही अधिक सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे अनुपालन करणे बंधनकारक असेल.


Back to top button
Don`t copy text!