गुड थॉट्स : सुप्रभात…आज ७ फेब्रुवारी…. देवाकडे काय मागावं

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

तुकारामांचे वडील बोल्होबा हे पांडुरंगाचे निस्सिम भक्त होते…
ते दरवर्षी न चुकता पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात असत…
आणि दरवर्षी त्यांची पत्नी कणकाई माऊली त्यांच्या मागे लागत असे की मलाही पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला न्या…
पण बोल्होबा काही तिचे ऐकत नसंत…
अशी अकरा वर्षे गेली.
बाराव्या वर्षी जेव्हा ते पंढरपूरला जाण्यास निघाले तेव्हा कणकाई माऊली काही ऐकेचना.
ती आपल्या पतीला म्हणाली की…
“जरी यावेळी तुम्ही मला पांडुरंगाच्या दर्शनाला नेले नाहीत तरी मी तुमच्या मागून येणारच.”
बोल्होबांचा नाईलाज झाला कारण स्रीहट्ट व बालहट्ट टाळता येत नाही ना..!!
ते म्हणाले…
” मी तुला माझ्या बरोबर नेईन पण एक अट तुला पाळावी लागेल ती म्हणजे मंदीरात गेल्यानंतर पांडुरंगाकडे काही म्हणजे काही मागायचे नाही”
कणकाई माऊली आनंदली तिने पतीला सांगीतले की मी काही मागणार नाही.
पती पत्नी पंढरपुरास निघाले..
तिथे पोहोचल्यानंतर कणकाई माऊली मनाशी विचार करीत चालली होती की आज आलोच आहोत तर पांडुरंगाचे दर्शन घेऊ आणि पंढरपूरही पाहू..!!
यात्रतेतली बांगड्याची, खेळण्यांची दुकाने हरखून पहात पहात ती बोल्होंबांच्या मागून चालत असल्याने त्या दोघांत अंतर पडले…
बोल्होबा पुढे निघून गेले आणि कणकाई माऊली मागेच राहीली…
इकडे बोल्होबा मंदीरात पोहोचल्या बरोबर पांडुरंगाची मान वर होती ती खाली झुकली…
रखुमाईने पांडुरंगाला विचारले की…
“सगळे भक्त दर्शनाला येतात तेव्हा तुमची मान वर असते आणि बोल्होबा आल्यानंतर तुमची मान खाली की झुकली??”
यावर पांडुरंगाने रखुमाईला उत्तर दिले की…
“तो जो सावकार असतो ना..त्याचे आपण देणेकरी असतो आणि देणेकरी जेव्हा आपल्या घरी येतो तेव्हा आपली मान खाली झुकलेली असावी.”
म्हणजे बघा, बोल्होबांनी पांडुरंगाची निस्वार्थपणे इतकी भक्ती केली…
इतकी भक्ती केली की, प्रत्यक्ष देवच त्यांचा देणेकरी झाला…
त्यांनी संपूर्ण आयुष्यभर देवाची भक्ति केली पण त्याच्याकडे कधीही काहीही मागितलेच नाही.
परमेश्वराची भक्ती करावी तर ही अशी ..!!!
इकडे बोल्होबा पांडूरंगाचे दर्शन घेऊन मागल्या दाराने बाहेर पडले आणि पुढल्या दाराने कणकाई माऊली देवळात आली…
तिने पांडुरंगासमोर हात जोडले आणि एकटक देवाकडे पहात राहीली..
तोच क्षण साधून पांडुरंगाने तिला विचारले…
“बोल तुला काय पाहिजे..??”
कणकाई माऊली विचारात पडली की आता काय करावे??
पतीची आज्ञा तर मोडता येत नाही…
पण मनुष्य मोठा हुशार प्राणी आहे बरं का…
चातुर्य कुठे व कसे वापरावे हे त्याला बरोबर कळते!!
तिने मनाशी पुन्हा विचार केला की पतीने सांगीतलेय की देवाकडे काही मागू नकोस पण हे कुठे सांगीतलेय की देव जर स्वत:हून काही देत असेल तर घेऊ नकोस…!!
ती पाडुरंगाला म्हणाली “पोटी संतान नाही.”
देव म्हणाला “जा निश्चिंतपणे घरी, तुला मुलगा होईल.”
ती खुप आनंदली हवं ते मिळाल्यावर माणूस देवाला जरा जास्तीच प्रदक्षिणा घालतो नाही का? हिनेही बऱ्याच प्रदक्षिणा घातल्या…
इकडे बोल्होबा बाहेर वाट पहात होते. त्यांच्या मनात विचार आला की आपल्या पत्नीला बाहेर यायला इतका वेळ लागला म्हणजे नक्कीच तीने देवाकडे काहीतरी मागितले असणार…
असा विचार करीत असतानाच कणकाई माऊली समोरून येताना दिसली…
तिने त्यांना देवळातला सगळा वृत्तांत सांगीतला…
ते सारे ऐकताक्षणीच बोल्होबा तिला घेऊन पुन्हा देवळाकडे निघाले…
पांडुरंगाकडे बोट दाखवून म्हणाले…
“याने तुला आशीर्वाद दिला ना की मुलगा होईल मग त्याला सांग की ,
“जर मला तू पुत्र देणारच असशील तर तुझी भक्ती करणारा, श्वासागणिक तुझेच नाम जपणारा, अखंड निष्कामतेने व निस्वार्थीपणे तुझी सेवा करणारा आज्ञेचा पुत्र दे..!!!!”
आणि नंतर तुकोबारायांचा जन्म झाला…
ज्यांचा नावाचा डंका आजही वाजतोय…

पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा
आपलाच शब्द वारकरी प्रा.रवींद्र कोकरे – ग्रामीण कथाकार,

श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, फलटण.
९४२१२१६८२१

 


Back to top button
Don`t copy text!