
दैनिक स्थैर्य | दि. १५ ऑगस्ट २०२४ | फलटण | फलटण शहराजवळून जाणार्या नीरा उजवा कालव्याच्या भरावाला चिरा पडल्या असून यामुळे कालवा फुटण्याचा धोका निर्माण झाला आहे. कॅनालच्या भरावाला चिरा पडल्याने भरावावरून जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे.
पाटबंधारे विभागाने याची कल्पना फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी मंडळ अधिकारी आणि तलाठी समक्ष जाऊन पाहणी करण्याचे निर्देश दिले. त्यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी चिंतेची बाब नसल्याचे सांगितले आहे. तसेच कॅनलचा फ्लो वरून कमी केल्याचे आणि त्या ठिकाणी रात्रीसाठी कालवा निरीक्षक यांची ड्युटी लावली असल्याचे सांगितले आहे. कॅनलचा फ्लो पूर्ण थांबताच रात्रीतून कामकाज सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा यावेळी तहसीलदार जाधव यांनी दिली.
दरम्यान, कॅनालला चिरा पडलेल्या ठिकाणी जलसंपदा विभागाच्या अधिकार्यांनी भेट देऊन पाहणी केली आहे.