
स्थैर्य, सातारा, दि. 12 सप्टेंबर : स्वातंत्र्य सैनिकांचे धाडस हे केवळ शारीरिक शौर्याचे प्रतीक नव्हते, तर ते त्याग आणि मातृभूमीप्रती असलेल्या असिम प्रेमाचेही प्रतीक होते. नागनाथअण्णा नायकवडींसारख्या क्रांतिकार्यांनी हिंसक मार्गाचा अवलंब करून प्रतिसरकारचे नेतृत्व केले. पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या कर्तृत्वाबद्दल आम्हाला नव्या पिढीला अभिमान आहे.या स्वातंत्र्यसैनिकांच्या धाडसी कृतींनी आणि बलिदानाने देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, असे प्रतिपादन वाळवा येथील हुतात्मा साखर कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी केले.
क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांनी 10 सप्टेंबर 1944 मध्ये सातारा तुरुंग फोडले. या घटनेला 81 वर्षे पूर्ण होत असून, त्या शौर्य दिनानिमित्त सातारा पद्मभूषण जिल्हा मध्यवर्ती कारागृह (जेल) येथे स्मृतिस्तंभावर पुष्पचक्र अर्पण केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी सातारा शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र म्हस्के, कारागृह अधीक्षक रमाकांत शेडगे, वीरधवल नायकवडी, हुतात्मा विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. बी. पाटील, सर्व शिक्षक, सर्व प्राध्यापक, हुतात्मा संकुलातील अनेक प्रमुख पदाधिकारी, मान्यवर उपस्थित होते.
वैभव नायकवडी म्हणाले, आपला देश स्वातंत्र्य करण्यासाठी अनेक क्रांतिकारकारांनी प्रयत्न केले. अनेकांनी प्राणांची आहुती दिली. पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या कर्तृत्वाबद्दल आम्हाला नव्या पिढीला अभिमान आहे. 10 सप्टेंबर हा दिवस सर्वांसाठी खूपच महत्त्वाचा आहे. नव्या पिढीला हा इतिहास कळावा म्हणून हा दिवस शौर्य दिन म्हणून सर्वांनी साजरा केला पाहिजे. या दिवसापासून आपण प्रेरणा घेतली पाहिजे. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली सातारा प्रतिसरकार स्थापन झाले, त्यामध्ये नागनाथअण्णा नायकवडी यांची खूप महत्त्वाची भूमिका होती. तब्बल 640 गावांमध्ये प्रतिसरकार होते. इंग्रज सरकारच्या सत्तेपुढे हे झुकले नाही. रमाकांत शेडगे म्हणाले, डॉ. नागनाथअण्णांचे शौर्य सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखे आहे. त्यांच्या ि शौर्यातून आम्हाला सर्वांना प्रेरणा मिळते. आता देश पुढे नेण्याची महत्त्वाची जबाबदारी तरुण पिढीवरच आहे.
यावेळी कोयना धरणग्रस्त संघटनेचे अध्यक्ष चैतन्य दळवी, प्रतिसरकार स्मारक समितीचे प्रा. विजय निकम, असलम तडसरकर, शंकर पाटील, दत्ताजी जाधव, छत्रपती शिवाजी कॉलेज व कला वाणिज्य कॉलेज साताराचे अनेक प्राध्यापक, बाळासाहेब पाटील, कुमार शिंदे, दिलीप सूर्यवंशी, प्रा. राजा माळगी, विश्वास मुळीक, शिवाजी शंकर पाटील, राजाराम शिंदे, अजित वाजे, तुकाराम डवंग, नारायण कारंडे, जयकर चव्हाण, बाळासाहेब नायकवडी, विश्वंभर बाबर, यांच्यासह विविध चळवळीमध्ये काम करणारे कार्यकर्ते उपस्थित होते.