99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी जिल्हा ज्योत समिती


स्थैर्य, सातारा, दि. 1 नोव्हेंबर : सातार्‍यात होणार्‍या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी जिल्हा ज्योत समितीचे गठण करण्यात आले आहे. 99 व्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष मंत्री श्री.छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी ही समिती गठीत केली आहे. या समितीत विविध क्षेत्रातील मान्यवरांना संधी देण्यात आल्याची माहिती 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी दिली.
राजधानी सातार्‍यात तब्बल 32 वर्षानंतर जानेवारी 2026 मध्ये 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. मसाप शाहूपुरी शाखा, मावळा फौंडेशनच्या वतीने हे संमेलन होणार असून त्याची जोरदार तयारी सुरु आहे. संमेलनाच्या तयारीने वेग घेतला असून विविध संस्थासमवेत बैठकाही झाल्या आहेत. संमेलनाचे नियोजन नेटके आणि वैशिष्टयपूर्ण व्हावे यासाठी विविध समित्या तयार करण्याचे काम सुरु आहे. नुकतेच मार्गदर्शन समिती, स्मरणिका संपादन समिती, ग्रंथदिडी, शोभायात्रा समिती, साहित्यिक व ऐतहासिक दालन समिती जाहीर करण्यात आली आहे. आता 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी जिल्हा ज्योत समिती गठीत करण्यात आली आहे.

सातार्‍याच्या लौकिकाला साजेसे, वैशिष्टयपूर्ण संमेलन व्हावे यासाठी पहिल्यापासून आयोजकांचे प्रयत्न सुरु आहेत. जिल्हा ज्योत समितीच्या माध्यमातून साहित्यिकांच्या गावामधून प्रेरणा ज्योत आणून त्या संमेलनस्थळी ठेवण्यात येणार आहे. ही समिती दीर्घकाळापर्यंत सातारकरांच्या स्मरणात राहील, असा प्रयत्न होईल अशी अपेक्षाही श्री. कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे.

या समितीचे प्रमुख रविंद्र बेडकिहाळ हे असून विनोद कुलकर्णी, नंदकुमार सावंत मार्गदर्शक आहेत. समितीच्या सदस्यांमध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग असून यामध्ये ताराचंद आवळे (फलटण ), विलास पिसाळ (वाई), महादेव गुंजवटे (फलटण ), प्रदीप चव्हाण (फलटण ), रविंद्र कोकरे (फलटण ), रुपेश जाधव (रहिमतपूर ), श्रीकांत जाधव (रहिमतपूर), रंजना सानप (खटाव), नितीन जाधव (पुसेगाव ), क्रांती पाटील (कराड), पांडुरंग ऐवळे (पाटण ) यांचा समावेश आहे.


Back to top button
Don`t copy text!