कोयना भूकंपग्रस्तांच्या चौथ्या पिढीतील वारसांना भूकंपग्रस्तांचे दाखले वाटप


दैनिक स्थैर्य । दि. १३ डिसेंबर २०२२ । सातारा । पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नांमुळे भूकंपग्रस्तांच्या व्याख्येत शासनाने बदल केला आहे. त्यामुळे आता भूकंपग्रस्तांच्या चौथ्या पिढीला भूकंपग्रस्तांचे दाखले देणे शक्य झाले आहे. त्याअनुषंगाने आज पाटण प्रांताधिकारी सुनील गाढे यांच्या हस्ते तालुक्यातील 36 लाभार्थ्यांना भूकंपग्रस्त दाखल्यांचे वाटप करण्यात आले.

भूकंपग्रस्तांच्या व्याख्येत केलेल्या बदलामुळे मूळ भूकंपग्रस्त व्यक्तीचे प्रमाणपत्र हे पणतू, खापर पणतू या स्तरापर्यंत हस्तांतरण अनुज्ञेय केले आहे. त्यामुळे  मूळ भूकंपग्रस्त लाभार्थ्यांच्या चौथ्या पिढीतील तरुणांना म्हणजेच पणतू/पणतींना  शासन सेवेतील भूकंपग्रस्त या वर्गवारीतून नोकरी मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. त्यामुळे शासनाच्या  या निर्णयाचे स्वागत होत असून विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री व पालकमंत्री यांना धन्यवाद दिले आहेत.

दि.15 डिसेंबरपर्यंत पोलीस भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू असल्याने पुढील दोन दिवस पूर्ण कागदपत्र सादर केल्यानंतर एका तासात दाखला संबंधित उमेदवाराला मिळेल या दृष्टीने प्रयत्न राहणार असल्याचे उपविभागीय अधिकारी श्री. गाढे यांनी स्पष्‌ट केले आहे. नोकरीसाठी विशेषतः पोलीस भरतीसाठी  प्रयत्न करणाऱ्या पाटण तालुक्यातील तरुणांना शुभेच्छा दिल्या आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे परिसरातील तरुणांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण असून या निमित्त  त्यांचा आत्मविश्वास नक्कीच वाढणार आहे.


Back to top button
Don`t copy text!