निरा-देवघर प्रकल्पाच्या ब्रांच कॅनॉलचे काम मार्गी लावल्याबद्दल उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा खा. रणजितसिंह, आ. गोरे यांच्या उपस्थितीत सत्कार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १३ जुलै २०२३ | फलटण |
निरा-देवघर प्रकल्पाच्या ब्रांच कॅनॉलची आज निविदा प्रसिद्ध झाली आहे. या कालव्यामुळे खंडाळा तालुक्यातील ९ व फलटण तालुक्यातील २० गावांना पाणी मिळणार आहे. हे काम १२०० मि.मी. व व्यासाच्या सिमेंट काँक्रिट बंदीस्त पाईपलाईनद्वारे होणार आहे. हे काम मार्गी लावल्याबद्दल फलटण तालुक्यातील जनतेच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत प्रदेश कार्यकारणी सदस्य जयकुमार शिंदे, विधानसभा प्रमुख सचिन कांबळे पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य धनंजय साळुंखे पाटील, युवा नेते अभिजित नाईक निंबाळकर, लतीफ तांबोळी, मनोज कांबळे पाटील उपस्थित होते.

फलटण तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा नीरा-देवघर प्रकल्प आहे. ४० वर्षे झाली या प्रकल्पाच्या पाणीप्रश्नावर सत्ताधार्‍यांनी राजकारण केले आहे. आज निरा-देवघर प्रकल्पाच्या ब्रांच कॅनॉलची निविदा प्रसिद्ध झाली. हे काम १२०० मि.मी. व व्यासाच्या सिमेंट काँक्रिट बंदीस्त पाईपलाईनद्वारे होणार आहे. या कालव्यामुळे खंडाळा तालुक्यातील ९ व फलटण तालुक्यातील २० गावांना पाणी मिळणार आहे. तसेच दर महिन्याला आवर्तन मिळणार असून या फलटण तालुक्यातील पाडेगाव, कोरेगाव, शिंदे मळा, तरडगाव, माळवाडी, कुसूर, रावडी खुर्द, रावडी बुद्रुक, डोंबाळवाडी, तडवळे, काळज, खामगाव, मुरूम, सुरवडी, निंभोरे, भिलकटी, वडजल, चौधरवाडी गावातील लोकांना याचा फायदा होईल. उर्वरित गावांची लवकरच निविदा निघणार आहे. माझ्या व तालुक्याच्या दृष्टीने हा भाग्याचा क्षण असल्याची माहिती खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.

कै. हिंदूराव नाईक निंबाळकर यांनी फलटण तालुक्याचा दुष्काळ संपविण्यासाठी जे स्वप्न पाहिलं होतं, ते आज पूर्ण होताना दिसत आहे. फलटण तालुक्यातील गावांना याचा लाभ होणार आहे. गेली अनेक वर्ष या तालुक्यातील सत्ताधारी नेत्यांनी यासाठी काहीही प्रयत्न केलेले दिसत नाहीत; परंतु मी खासदार झाल्यानंतर या तालुक्याच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून बैठका घेऊन यास मान्यता घेतली व त्यास मान्यता घेऊन आज निविदा प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे या तालुक्यातील जनतेला पाणी कमी पडणार नाही. खासदार झाल्यानंतर या तालुक्यातील इंच ना इंच जमीन भिजविण्याचे हे स्वप्न मी पाहिलं होतं, ते आज राज्य सरकारने पूर्ण केलेच, याचा आम्हाला आनंद होत आहे.

या तालुक्यातील धोम-बलकवडी चारमाहीवरून आता तो बारामाही होणार, तसेच या तालुक्यातील जनता फलटण तालुक्यात तीन कॅनॉल जाताना पाहणार आहे. भविष्यातील नवीन तरुण पिढी ही रोजगारासाठी आता मुंबई-पुण्यामध्ये नोकरीला जाणार नाही. स्वतःच्या शेतीबरोबरच व्यवसायसुद्धा आता आपल्या तालुक्यामध्ये करताना दिसणार आहे. त्यामुळे या तालुक्यात हरितक्रांतीबरोबरच आर्थिकक्रांती सुद्धा निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. यापुढे शेतीबरोबरच युवकांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले आहे.


Back to top button
Don`t copy text!