

स्थैर्य, फलटण, दि. २ सप्टेंबर : नीरा खोऱ्यातील प्रमुख चारही धरणांमध्ये मिळून आजमितीला ४८.१३ टी.एम.सी. म्हणजेच ९९.५० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. भाटघर आणि नीरा देवघर ही दोन्ही धरणे पूर्ण क्षमतेने भरली असून, वीर आणि गुणवडी ही धरणेही काठोकाठ भरलेली आहेत. यामुळे फलटण तालुक्यासह संपूर्ण परिसरातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
नीरा उजवा कालवा विभागाने आज प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, भाटघर आणि नीरा देवघर ही धरणे १०० टक्के भरलेली आहेत. तर, वीर धरण ९९.४७ टक्के आणि गुणवडी धरण ९५.६६ टक्के भरले आहे. गतवर्षी आजच्या दिवशी धरणांमध्ये एकूण ९९.३० टक्के पाणीसाठा होता, त्या तुलनेत यंदाची स्थितीही अत्यंत समाधानकारक आहे.
धरणांमधील पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी वीर धरणातून नीरा नदीच्या पात्रात २,६५० क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे. तसेच, सिंचनासाठी नीरा उजवा आणि डाव्या कालव्यातूनही पाणी सोडण्यात येत आहे. नदीतील विसर्ग कायम असल्याने नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.