संततधार पावसाने ढेबेवाडी विभागात पिकांमध्ये पाणी साचून पिकांना धोका

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, पाटण, दि. 20 : उघडीप न देता सलग कोसळणार्‍या संततधार पावसाने ढेबेवाडी विभागात चांगल्या प्रकारे उगवण झालेल्या पिकांमध्ये पाणी साचून पिकांना धोका निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी पाणी साचून पिके कुजू लागली आहेत तर चांगल्या प्रकारे वाढ झालेल्या पिकांच्या दाणे भरणीसाठी पावसाच्या उघडिपीची बळीराजाला प्रतीक्षा आहे. लवकरच पावसाने उघडीप दिली नाही तर पिकांच्या नुकसानीमुळे शेतकर्‍यांंची चिंता वाढणार आहे.

जून, जुलैमध्ये तुरळक स्वरूपात पडलेल्या पावसाचा अपवाद वगळता विश्रांती घेतलेला पावसाने ऑगस्टच्या प्रारंभीपासून चांगलाच जोर पकडला आहे. मुसळधारेसह बरसणारा पाऊस खरीप पिकांना उपयुक्त काही प्रमाणात लाभदायक ठरला आहे. मात्र  पावसाने उघडीप दिली नसल्याने पिकांना धोका निर्माण झाला आहे. चवळी, दारकू, वाटाणा, मूग अशी आंतरपिके कुजू लागली आहेत. शेतकर्‍यांना नुकसानीचा फटकाही बसला आहे. हातातोंडाला आलेल्या पिकांचे अति पावसामुळे नुकसान होत असून शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

 

चालू वर्षी उन्हाळ्यात वळिवाने आणि जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मान्सूनपूर्व पावसाचे आगमन झाल्याने जमिनीच्या मशागती उरकून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकरी बांधवांनी जूनच्या दुसर्‍या आठवड्यात धुमधडाक्यात खरीप पेरण्या सुरू करून उरकल्या.    कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर असलेल्या लॉकडाउनमुळे ढेबेवाडी विभागात मुंबईहून मोठ्या प्रमाणावर गावात वास्तव्यास असलेल्या चाकरमान्यांनी एप्रिल, मे महिन्यात शेतीच्या मशागतीवर लक्ष दिले होते. जूनमध्ये पेरण्या उरकल्यानंतर आठ-पंधरा दिवसात उगवणही चांगली झाली तर पावसानेही सलग वीस-पंचवीस दिवस उघडीप दिल्याने भांगलण, कोळपणी व अन्य आंतरमशागती आरामात करून घेता आल्या. त्याचा तणनाश होण्यास चांगला लाभ झाला.  8 जुलैनंतर थांबून थांबून पावसाच्या सरी येत राहिल्याने पीक वाढीला त्या उपयुक्त ठरल्याने पिकांची दमदार वाढ झाली होती.

 

पावसाच्या आगमनाची अपेक्षा असतानाच ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून दमदार पावसाचे आगमन झाले तर काही दिवस मुसळधार पावसाने  सुरुवात केली. प्रारंभी आवश्यक असणार्‍या पावसाचा  खरिपाला लाभ झाला. मात्र सलग संततधार पावसामुळे पिकांमध्ये पाणी साचलेले असून आंतरपिके कुजू लागली आहेत. अनेक ठिकाणी सोयाबीन, उडीद , भुईमूगचे पीक पाण्यात बुडून शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पीक परिस्थिती चांगली असताना सततच्या पावसाने पिकांची वाढ चांगल्या प्रकारे होऊन सुद्धा अतिपावसाचा अनिष्ट परिणाम होऊन नुकसान होऊ लागले आहे. त्यामुळे एका बाजूला कोरोनाचे संकट तर दुसर्‍या बाजूला पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. पावसामुळे नुकसान झालाल्या पिकांचे पंचनामे करून शासनाने शेतकर्‍याला मदतीचा हात द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!