एकता दौडीमध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे

खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांचे आवाहन


स्थैर्य, सातारा, दि. 31 ऑक्टोबर : 1947 साली फाळणी होवून, ज्यावेळी स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी आज असलेला भारतदेश अनेक संस्थानिकांमध्ये विभागला गेला होता. भारतमातेचे सुपूत्र सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्वातंत्र्योत्तर भारत एकसंघ करण्यासाठी केलेल्या सर्वकष प्रयत्नामुळे आज विविधतेमध्ये एकता असलेला एकसंघ भारत देश निर्माण होऊ शकला. त्यांच्या जयंतीदिनी देश एकसंघ राहण्यासाठी संपूर्ण सातारा जिल्हयात आयोजित केलेल्या एकता दौड मध्ये प्रत्येक भारतीय नागरीकाने सहभागी व्हावे, असे आवाहन खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी केले.

भारतीय जनता पक्षाच्यावतीने घेण्यात आलेल्या निर्णयानुसार संपूर्ण देशामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचे जयंती निमित एकता दौड आयोजित करण्यात आली आहे. त्यानुसार सातारा जिल्हा भाजपाच्यावतीनेही जिल्ह्यात ठिकठिकाणी शुक्रवार दि. 31 रोजी एकता दौडीचे आयोजन करण्यात आले आहे.

या पार्श्वभुमीवर खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटलेे की, स्वातंत्र्योत्तर भारताचे पहिले गृहमंत्री म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलेले कार्य निश्चितच अजोड अलौकिक व आश्चर्यजनक आहे. ब्रिटीशांनी देशाची फाळणी करुन स्वातंत्र दिले. फाळणीनंतर व आता असलेल्या भारतात अनेक सरंजामदार, संस्थानिक, निजामशाही अश्या सुमारे 350 इतक्या सताराजवटी कार्यरत होत्या. त्या सर्व सताधारी राजवटींशी बोलणी करून, सरदार वल्लभभाई पटेल यांनी या सर्वाचे भारतदेशामध्ये विलिनीकरण केले. शेवटच्या टप्यात हैद्राबादच्या तत्कालीन सत्ताधारी असलेल्या निजामाशी चर्चा करुन विलिनीकरण होत नाही असे दिसल्यावर सशत्र कारवाई केली व त्यामुळे, हैद्राबाद भारतात विलिन झाले. जम्मु आणि काश्मिरचा प्रश्न तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरूंनी आपल्याकडे निर्णयार्थ ठेवला होता. त्याचेही संपूर्ण विलिनीकरणाचा निर्णयही अखेर सध्याचे पंतप्रधान ना. नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री ना. अमितभाई शहा यांनीच घेतला. पोलादी पुरुष म्हणून मान्यता पावलेल्या सरदार पटेल यांच्या करारी व्यकतीमत्वात सामावलेले निस्सिम देशप्रेम, अजोड निर्णयक्षमता, निस्वार्थी वृत्ती आदी कौशल्ये आचरणात आणणे काळाची गरज आहे.

आजच्या विविधतेमध्ये एकता असलेल्या भारतदेशाची एकता एकसंघपणा अधिक दृढ व्हावा, यासाठीच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित सातारा जिल्हा भाजपाच्या विविध आघाड्या, युवामोर्चाचे वतीने जिल्हयातील ठिकठिकाणी कृतज्ञतापूर्वक आयोजित केलेल्या एकता दौडीमध्ये सर्वांनी आवर्जुन उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केले आहे. तसेच दि.31 आक्टोबर हा दिवस भारताच्या कणखर पंतप्रधान स्व. इंदिराजी गांधी यांचाही पुण्यस्मरण दिन आहे. देशाच्या माजी पंतप्रधान स्व इंदिरा गांधी आणि देशाचे गृहमंत्री स्व. सरदार वल्लभभाई पटेल या दोन महान व्यक्तीच्या चिरंतन समृतींना आम्ही विनम्र अभिवादन करतो असेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे.


Back to top button
Don`t copy text!