
दैनिक स्थैर्य । दि. २८ ऑक्टोबर २०२२ । बारामती । करांमधून सरकारला उत्पन्न मिळतं ही बाब मान्य आहे. पण हा कर लादताना त्याचं विशिष्ट प्रमाण असावं अन्यथा त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, शेतीकडे व व्यापारी वर्गाकडे केंद्र सरकारचे दुर्लक्ष असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली.
बारामती मर्चंटस असोसिएशनच्यावतीनं दरवर्षी दिवाळी पाडव्याच्या दिवशी शरद पवारांच्या मार्गदर्शनपर भाषणाचं आयोजन केलं जातं. या भाषणात व्यापाऱ्यांनी जीएसटीबाबत नाराजी व्यक्त केल्याचा धागा पकडून शरद पवारांनी कररचनेबद्दल केंद्रावर हल्लाबोल केला. पवार म्हणाले, मनमोहन सिंग पंतप्रधान असताना जीएसटी लागू करण्याबाबत राज्याच्या मुख्यमंत्र्यांची एक बैठक बोलावली होती. या बैठकीत गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक विरोध दर्शवला होता. मात्र, आज त्यांची भूमिका पूर्णपणे बदलली आहे. जीएसटीच्या माध्यमातून अधिक उत्पन्न मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, मात्र त्याचा परिणाम सर्वच व्यवसायांवर झालेला दिसतो आहे.
सोन्याच्या खरेदीवर 38 टक्क्यांपर्यंत, वाहन खरेदीवर 40 टक्क्यांपर्यंत कर लावला जातो. महाराष्ट्र ऑटोमोबॉईल हब आहे. या माध्यमातून रोजगारनिर्मिती तर होतेच पण त्याच बरोबर अनेक लघुद्योगही चालतात. यामुळं हा कर सर्वांवर परिणाम करणारा ठरतोय. व्यापार वाढवायचा असेल तर राज्य व केंद्राचे धोरण पूरक, प्रोत्साहनपर हवं, अशी अपेक्षाही यावेळी पवारांनी व्यक्त केली. जीएसटीमुळं भुर्दंड वाढला, गुळाची आवक मंदावली. वारंवार कररचनेतील बदलांचा फटका बसत असल्याचं प्रास्तविक मध्ये मर्चंट असोसिएशन चे अध्यक्ष अमोल शहा -वाडीकर यांनी सांगितले.
यावेळी खासदार सुप्रिया सुळे, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, जवाहर वाघोलीकर, अमोल वाडीकर, वालचंद संचेती, पोपटलाल ओस्तवाल, किशोर सराफ, सदाशिव सातव, जय पाटील, नीलेश भिंगे, सचिन सातव, नीलेश निंबळककर, यश संघवी, तेजपाल निंबळककर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील यांनी केलं.