
स्थैर्य, वाई, दि. १३: बावधनची बगाड यात्रा (ता वाई) गावकऱ्यांच्या अंगलट आली आहे. आतापर्यंत या परिसरातली वाड्यावस्त्यांवरील तब्बल ६१ जण करोना बाधित आढळले आहेत. बावधन ग्रामीण रूग्णालयातील आरोग्य अधिकाऱ्यांना व बगाड यात्रेत बंदोबस्तावर असणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक व आठ कर्मचाऱ्याना देखील संसर्ग झाला आहे.
शासनाने केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशानंतरही नंतरही मोठी गर्दी जमवत बावधन (ता. वाई) येथील ग्रामदैवत भैरवनाथाच्या बगाडाची मिरवणूक हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडली. त्यानंतर आता दहा दिवसांनी बावधन आणि परिसरातील वाड्या वस्त्यांमधील ग्रामस्थांना काराेनाची बाधा झाल्याचे रुग्ण संख्येवरून आढळून येते आहे. आजपर्यंत ६१ ग्रामस्थांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान बाधितांची संख्या थाेपविण्यासाठी बावधन आणि परिसरातील प्रत्येक घरातील ग्रामस्थाची तपासणी करणे आवश्यक बनले आहे.
संचारबंदी आणि प्रतिबंधित क्षेत्र असताना ग्रामस्थांनी अत्यंत गोपनियता पाळून बगाड यात्रेची शेकडो वर्षांची परंपरा जपली. यामध्ये सामाजिक अंतराचा पूर्णपणे फज्जा उडाला . त्यानंतर तहसीलदार रणजित भोसले यांनी सुमारे अडीच हजार जणांवर गुन्हा दाखल केला. त्यापैकी ११०ग्रामस्थांना अटक करण्यात आली होती.
आजपर्यंत एकूण ७७ ग्रामस्थांना काराेनाची बाधित झाली.यातील ६२ ग्रामस्थांवर उपचार सुरु आहेत. संबंधित ग्रामस्थांना त्रास जाणवू लागल्याने त्यांनी तपासणी केली. त्यानंतर ग्रामस्थांना काेराेनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले वाढती रुग्ण संख्या मोठी समस्या निर्माण झाली आहे. ग्रामस्थ स्वतःहून तपासणीसाठी पुढे येत नाहीत.आराेग्य विभागाच्या सहकार्याने तातडीने बावधन आणि परिसरातील वाड्यावस्त्यांवर जाऊन प्रत्येक ग्रामस्थाची तपासणी करणे गरजेचे झाले आहे. वाई तालुक्यात करोना बाधितांची संख्याही वाढू लागली आहे. त्यामुळे साखळी तोडण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे.