संमेलनाचा नवा पॅटर्न तयार व्हावा : डॉ. सदानंद मोरे


दैनिक स्थैर्य । 14 जून 2025 । सातारा । सातार्‍यात अखिल भारतीय साहित्य संमेलन होणे, हा एक ऐतिहासिक क्षण आहे. त्यातून सातार्‍याच्या साहित्य संमेलनाचा नवा पॅटर्न तयार व्हावा, अशी अपेक्षा ज्येष्ठ साहित्यिक व संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केली.

आम्ही पुस्तकप्रेमी समूह व दीपलक्ष्मी पतसंस्थेतर्फे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांचा आज विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात ते बोलत होते. कूपर कॉर्पोरेशनचे मुख्य मानव संसाधन अधिकारी नितीन देशपांडे, आम्ही पुस्तकप्रेमी समूहाचे डॉ. संदीप श्रोत्री, श्रीराम नानल, शिरीष चिटणीस, मुकुंद फडके आदींची यावेळी उपस्थिती होती.

सातारा शहराला अनेक संदर्भ आहेत. आधुनिक इतिहास घडविण्याचे, लिहिण्याचे कार्य हे सातार्‍यातून झाले. या संमेलनाच्या निमित्ताने येथील साहित्यिक चळवळीला बळ मिळेल, असेही डॉ. मोरे यांनी स्पष्ट केले. विनोद कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतात सातार्‍यात होणार्‍या साहित्य संमेलनआयोजनामागील प्रवास उलगडला.

नितीन देशपांडे, नंदकुमार सावंत यांनीही आपले विचार व्यक्त केले. शिरीष चिटणीस यांनी विनोद कुलकर्णी यांच्या ध्यासाचा, धडपडीचा हा सत्कार असल्याचे सांगितले. मुकुंद फडके वाचन संस्कृती, साहित्य संस्कृती वाढविण्यासाठी हे संमेलन उपयुक्त ठरणार असल्याचे मत व्यक्त केले. डॉ. संदीप श्रोत्री यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास आम्ही पुस्तकप्रेमी समूहाचे सदस्य तसेच साहित्यप्रेमी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!