
दैनिक स्थैर्य | दि. ४ ऑगस्ट २०२३ | फलटण |
कृषी विभागाच्या कार्यतत्परतेमुळे धुमाळवाडी गावाने प्रधानमंत्री पीक विमा योजनेत १०० टक्के सहभाग नोंदवला आहे.
सातारा जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी भाग्यश्री पवार-फरांदे, उपविभागीय कृषि अधिकारी फलटण कैलासराव धुमाळ, तालुका कृषि अधिकारी फलटण सागर डांगे, मंडल कृषी अधिकारी विडणी अमोल सपकाळ, कृषि पर्यवेक्षक तानाजी काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली कृषि विभागामार्फत प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम प्रचार व प्रसिद्धीचे काम धुमाळवाडी गावामध्ये मोठ्या प्रमाणात करण्यात आले. तसेच कृषि सहाय्यक सचिन जाधव यांनी शेतकर्यांच्या बांधावर जाऊन शेतकर्यांना मार्गदर्शन केले. तसेच गाव बैठकीच्या माध्यमातून पीक विमा योजनेची माहिती देण्यात आली. सोशल मीडिया ‘व्हाट्सएप’च्या आणि वाड्यावस्ती वरती जाऊन पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. या सर्वाचा परिणाम म्हणून आज धुमाळवाडी गावातील १०० टक्के शेतकर्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभाग नोंदविला आहे.
धुमाळवाडी, ता. फलटण जिल्हा सातारा या गावात फळ पिकाखाली क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. तसेच खरीप हंगामात पेरणी केलेल्या क्षेत्राचे व प्रधानमंत्री पीक विमा योजनेमधील अधिसूचित बाजरी व कांदा पिकाचा ५९ शेतकर्यांनी आपल्या ३२.८५ हेक्टर क्षेत्राचा पीक विमा काढला आहे. खरीप हंगाम अधिसूचित पिकांखालील १०० टक्के शेतकर्यांनी सहभाग नोंदवला आहे.
धुमाळवाडी गाव हे फलटण तालुक्यातील पीक विमा योजनेत १०० टक्के सहभाग नोंदविणारे पहिले गाव आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत गावातील शेतकर्यांनी १०० टक्के सहभागी नोंदवून इतर गावातील शेतकर्यांसाठी नक्कीच आदर्श ठेवला आहे. या कामासाठी गावचे तलाठी लक्ष्मण अहिवळे, ग्रामसेविका मोनिका मुळीक, पोलीस पाटील पल्लवी पवार तसेच गावतील ग्रामपंचायत सदस्य यांचे विशेष सहकार्य लाभले.
या कामामुळे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी सातारा भाग्यश्री पवार फरांदे, उपविभागीय दंडाधिकारी (प्रांतसाहेब) सचिन ढोले, तहसीलदार फलटण डॉ. अभिजित जाधव यांनी कृषि विभागाचे विशेष अभिनंदन केले आहे.