
स्थैर्य, 13 मार्च, सातारा : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सातारा शहरात महिला अधिकारी आणि कर्मचार्यांच्या वतीने भव्य ’बाईक रॅली’ काढण्यात आली. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी रचलेल्या शिक्षणाच्या पायामुळेच आज महिला सर्वच क्षेत्रांत नेतृत्वाची शिखरे सर करत आहेत, अशा शब्दांत महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करत जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी या रॅलीला झेंडा दाखवून मार्गस्थ केले.
यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने, जिल्हा माहती अधिकारी वर्षा पाटोळे, गणेश देशमुख, नेताजी बिसले, प्रकाश जाधव, उद्धव इंगवले यांच्यासह विविध विभागांच्या महिला अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
सकाळी गांधी मैदान येथून या रॅलीचा प्रारंभ झाला. डोक्यावर फेटा, हातात सामाजिक संदेशांचे फलक आणि ’जय जिजाऊ, जय सावित्री’च्या जयघोषाने सातारा शहर दुमदुमून गेले होते. शेकडो महिला अधिकारी आणि कर्मचार्यांनी आपल्या दुचाकींसह या रॅलीत सहभाग नोंदवला. शहरातील मुख्य मार्गावरून ही रॅली काढण्यात आली.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी संतोष पाटील म्हणाले की, आज आपल्या महिला अधिकारी पुरुष अधिकार्यांच्या बरोबरीने, किंबहुना त्यांच्यापेक्षाही सरस कामगिरी करत आहेत. सावित्रीबाईंच्या विचारांमुळेच आपण आज इथपर्यंत पोहोचलो आहोत. नोकरीमध्ये स्थिरावल्यानंतर आता समाजातील तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा.
ज्या उत्साहात आज ही बाईक रॅली काढण्यात आली, तसाच उत्साह आणि कर्तव्यदक्षता वर्षभर आपल्या शासकीय कामकाजातही दिसून येवो, अशी अपेक्षा जिल्हाधिकार्यांनी यावेळी व्यक्त केली
जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली म्हणाल्या, जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शासकीय कार्यालयात काम करणार्या अधिकारी आणि कर्मचारी महिला काढण्यात आली आहे. आम्ही सगळे अगदी सक्षमपणे प्रशासनात काम करीत आहोत. समाजातील प्रत्येक मुलीने संकटांना तोंड देण्यासाठी अजिबात घाबरू नका आणि त्याला चांगल्या पद्धतीने प्रतिकार करा हीच खरी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची दारे उघडे करुन दिले त्याला न्याय दिल्यासारखे होईल.

