
दैनिक स्थैर्य । 27 मे 2025 । फलटण । बहुप्रतिक्षित पालखी महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरु असताना फलटण तालुक्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीवेळी या मार्गावर ठिकठिकाणी पाणी साठल्याचे चित्र समोर आले. पावसाळ्याच्या तोंडावर पालखी महामार्गाची ही झालेली अवस्था पाहून महामार्गाच्या कामत गौडबंगाल झाला आहे की काय? अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.
तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाणगंगा नदीच्या पात्रात पाण्याची वाढ झाल्याने आळंदी – पंढरपूर महामार्गावरुन पाणी वाहत असल्याचे चित्र पहायला मिळाले. फलटण तालुक्यातील वडजल गावात अजब प्रकार पुढे आला आहे. याठिकाणी पाणी वाहून जाण्यासाठी जी पाईप लाईन टाकण्यात आली आहे ती फक्त अर्ध्यापर्यंत टाकण्यात आली असून त्या पाईपचे तोंड दोन्ही बाजूला काँक्रीट टाकून बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे पाणी वाहून न जाता अर्धे गाव पाण्यात बुडाले होते. महामार्गावर असणार्या राजुरी, बरड या गावातही अशीच परिस्थिती असल्याचे सांगण्यात येत आहे.
पाण्याचा निचरा होण्यासाठी संबंधित विभागाने व कंत्राटदाराने रस्त्याच्या कामात योग्य ती खबरदारी घेतली नसल्याचा आरोप संबंधित बाधित गावांमधून होताना दिसत आहे.