
दैनिक स्थैर्य | दि. 25 एप्रिल 2025 | फलटण | फलटण शहरात गेल्या ३५ वर्षात एवढा विकास कधीही झाला नव्हता. तेवढा विकास हा माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या माध्यमातून सुरु झालेला आहे. फलटणची बारामती करायची असेल तर विकासकामे सुरु झाल्यावर थोडा त्रास हा सहन करावा लागणार आहे. गेल्या ३५ वर्षात एवढा विकास कधीही झाला नाही, त्यामुळे विरोधकांना पोटशूळ उठला आहे, असे मत माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी व्यक्त केले आहे.
माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सदरील माहिती दिली.
रणजितसिंह नाईक निंबाळकर हे खासदार झाल्यापासून फलटण शहराचा सर्वांगीण विकास सुरु केला आहे. त्यामध्ये काही महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत सचिन पाटील यांच्या पाठीशी फलटणची जनता ठामपणे उभी राहिली होती. फलटणचा सर्वांगीण विकास यांच्यावरच जनतेने आमच्यावर विश्वास ठेवला आहे. ज्यावेळी विकासकामे सुरु होतात त्यावेळी सर्वसामान्य नागरिकांना थोडा फार त्रास हा सहनच करावा लागतो. फलटण नगरपरिषदेच्या शेजारी भव्य – दिव्य कॉम्पलेक्स उभारत आहे. एवढी वर्षे सत्ता करून सुद्धा शहरात ठोस विकासकामे यांना करता आली नाहीत, त्यामुळेच कांगावा सुरु केला असल्याचे मत सुद्धा अशोकराव जाधव यांनी व्यक्त केले आहे.